मनपाने केला ८० लाखांचा चुराडा

By Admin | Updated: June 9, 2014 01:05 IST2014-06-09T01:01:28+5:302014-06-09T01:05:28+5:30

मुजीब देवणीकर , औरंगाबाद शहरातील १५ लाख नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देण्याचा मुद्या आल्यावर मनपा प्रशासनाकडे पैसेच नसतात.

Manipane crushed 80 lakhs | मनपाने केला ८० लाखांचा चुराडा

मनपाने केला ८० लाखांचा चुराडा

मुजीब देवणीकर , औरंगाबाद
शहरातील १५ लाख नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देण्याचा मुद्या आल्यावर मनपा प्रशासनाकडे पैसेच नसतात. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची दाखविली जाते; पण प्रत्यक्षात असे नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी पालिकेच्या तिजोरीत भरपूर पैसे आहेत...! म्हणूनच मध्यवर्ती जकात नाका येथील एलबीटी कार्यालयाच्या डागडुजीवर मनपाने तब्बल ८० लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एलबीटीचे कार्यालय मनपासाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. जकात रद्द झाल्यानंतर शहरात (लोकल बॉडी टॅक्स) एलबीटीचा प्रकल्प यशस्वी ठरला. दरमहा सुमारे २० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत एलबीटीपोटी जमा होतात. मध्यवर्ती जकात नाक्याच्या जुन्या कार्यालयातच एलबीटीचे कार्यालय थाटण्यात आले आहे.
भविष्यात एलबीटी टॅक्स रद्द होणार हे सर्वश्रुत आहे. दोन महिन्यांपासून तर शहरातील व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले असून, मनपाला एलबीटी न भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या या ताठर भूमिकेमुळे मनपाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडल्या गेला असून, दर महिन्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार करणेही अवघड होऊन बसले आहे.
एलबीटी आज नाही तर उद्या रद्द होणार हे माहीत असतानाही मनपाने ८० लाख रुपयांचे कार्यालय उभारले आहे. जुन्या कार्यालयातच अत्याधुनिक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी केबिनची स्वतंत्र व्यवस्था यात आहे. शासनाने लवकरच एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर या खर्चावर पाणी फेरल्यासारखे होईल. एलबीटीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा नव्हती. त्यांच्यासाठी ही डागडुजी करण्यात आली. या कामावर ३५ ते ३७ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. काम सुरू केले तेव्हा एलबीटी रद्द होण्याची शक्यता नव्हती. ८० लाखांचा खर्च झाला नाही, असे उपअभियंता बी. डी. फड यांनी सांगितले.
चतुर अधिकारी
एलबीटीच्या कार्यालयावर सुमारे १ कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याचा प्लॅन काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आखला. या कामाची एकच निविदा काढली तर राजकीय मंडळी काम होऊ देणार नाही, त्यापेक्षा दोन ते तीन टप्प्यात निविदा काढल्या तर कोणालाच कळणार नाही.
छोट्या निविदा मंजूर करण्यासाठी स्थायी समितीची गरज पडत नाही. २४ लाख रुपयांच्या वेगवेगळ्या निविदा काढून मर्जीतील कंत्राटदारालाच ही कामे दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
रुग्णालयाचा प्रस्ताव
मध्यवर्ती जकात नाका येथील जागेवर २०० खाटांचे भव्य रुग्णालय मनपा बांधणार आहे. या प्रकल्पाची फाईल बीओटी विभागाकडून मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच रुग्णालयाचे बांधकाम मनपाकडून सुरू होईल. त्यापूर्वी मध्यवर्ती जकात नाक्यावर असलेले एलबीटीचे कार्यालय पाडावे लागेल.
मनपा प्रशासनाला या सर्व गोष्टींचा बोध असतानाही कार्यालयाच्या अत्याधुनिकीकरणावर तब्बल ८० लाख रुपये कशासाठी खर्च करण्यात आले, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मनपाच्या तिजोरीत येणारा पैसा हा जनतेच्या घामाचा असून, त्यावर विकासकामे अपेक्षित आहेत. प्रशासन या पैशांची अशा पद्धतीने उधळपट्टी करीत आहे.

Web Title: Manipane crushed 80 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.