गळा दाबून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:02 IST2021-05-21T04:02:12+5:302021-05-21T04:02:12+5:30

नुकसान भरपाई आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग औरंगाबाद : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी ज्योती (२५) ...

Life imprisonment for strangling wife, | गळा दाबून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप,

गळा दाबून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप,

नुकसान भरपाई आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी

प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग

औरंगाबाद : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी ज्योती (२५) हिचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपाखाली आरोपी पती रामदास केरुबा साळवे (४०, मूळ रा . बाळखेडा ता.कन्नड , हल्ली राजीवनगर झोपडपट्टी , औरंगाबाद ) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी गुरुवारी ( दि.२०) जन्मठेपेची शिक्षा आणि ३ हजार रुपये दंड ठोठावला.

मृत ज्योतीची बहीण आशाबाई दिलीप धनराज यांच्या फिर्यादीवरून रामदासविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ए. बी. आव्हाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडिया यांनी खटल्याच्या सुनावणीत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी ज्योतीचा भाऊ सुनील जगताप आणि डॉक्टरांचे जबाब महत्त्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी रामदासला जन्मठेप आणि दंड ठोठावला. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल उत्तम तायडे यांनी सहकार्य केले.

खुनाच्या घटनेच्या ३ वर्षांपूर्वी ज्योती आणि रामदासचे लग्न झाले होते. रामदास पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, तिला नेहमी मारहाण करीत होता. घटनेच्या ५ महिन्यापूर्वी रामदास त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी अश्विनी (१२) हिला सोबत घेऊन रेल्वे स्थानकालगतच्या राजीवनगर झोपडपट्टी येथे राहण्यास गेला होता. तर ज्योती तिचा मुलगा आदित्य (दीड वर्ष ) याच्यासोबत अब्रार कॉलनी येथे राहत होती.

१५ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी रामदास ज्योतीला घेऊन राजीवनगर येथे गेला होता. रामदास त्याच दिवशी सायंकाळी ज्योतीचा चुलत भाऊ सुनील जगताप यांच्या घरी गेला व ज्योती लघवीचा बाहाणा करून निघून गेली आहे. तुमच्याकडे आली का अशी चौकशी केली होती. दुसऱ्या दिवशी सासू सासऱ्याच्या घरून रामदास मुलगा आदित्य याला घेऊन गेला होता. त्यानंतर बहीण भावंडांनी शोध घेतला असता राजीवनगर येथील रामदासच्या खोलीत ज्योती बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडलेली, तिच्या नाका तोंडातून रक्त आलेले आणि तिचा गळा दाबल्याच्या खुणा दिसल्या होत्या. पोलिसांनी ज्योतीला घाटी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.

चौकट

पुनर्वसन आणि भरपाईसाठी प्रकरण

विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग

मृताचा अल्पवयीन मुलगा आणि मुलीचे पुनर्वसन आणि नुकसान भरपाईसाठी सत्र न्यायालयाने हे प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेच्या

कलम ३५७(ए ) नुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविण्याचे आदेशात म्हटले आहे.

Web Title: Life imprisonment for strangling wife,