चला कॅशलेस होऊया; इथे अंडा आम्लेटचे बिल ‘पेटीएम’वर अदा होते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 23:36 IST2016-12-31T23:33:17+5:302016-12-31T23:36:58+5:30
लातूर या गाड्याचे मालक चेतन चव्हाण यांनी आपल्या गाड्यावर ‘पेटीएम’चा बारकोड लावून टाकला.

चला कॅशलेस होऊया; इथे अंडा आम्लेटचे बिल ‘पेटीएम’वर अदा होते!
निशिकान्त मायी लातूर
लातूर : औसा रोडवरील अंडा आम्लेटचा गाडा.. दररोज संध्याकाळी खवय्यांची गर्दी.. हजार-पाचशेच्या नोटाबंदीनंतरही रोकड नसल्याने ही गर्दी ओसरली नाही. उलट वाढली. कारण या गाड्याचे मालक चेतन चव्हाण यांनी आपल्या गाड्यावर ‘पेटीएम’चा बारकोड लावून टाकला. दुसऱ्या गाड्यावर जिथे रोख द्यायला खिशात दमडी नाही, अशा लोकांनीही कॅशलेस व्यवहार होतो म्हणून चौकशी करुन करुन गर्दी वाढविली ! बदल.. बदल.. म्हणतात तो आणखी काय असतो...? नाही..!
पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्यासमोर अनेक छोटे छोटे व्यवसाय करणारे गाडे आहेत. पाणीपुरी, भेळपुरी, नारळपाणी, खारेमुरे ते अंडा आम्लेट. खवय्यांची गर्दी खेचून घेणारे हे गाडे. याशिवाय क्रीडा संकुलाच्या बसस्टॉपवर बसची प्रतीक्षा करणारे अनेक प्रवासी इथे थांबतात. वाहनांची वाट पाहताना पोटातल्या भुकेला शांत करण्यासाठी हे गाडे म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलच. चेतन चव्हाण नावाचा एक गाडेवाला गेल्या आठ ते दहा वर्षांपासून या रस्त्यावर आपला गाडा लावून उभा असतो. जेमतेम शिकलेला चेतन पंतप्रधान मोदींचा चाहता नाही की विरोधक नाही. शासनाच्या निर्णयाचा आदर करताना त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस व्यवहाराचे आवाहन ऐकले अन् नोटाबंदीनंतर आपल्याकडे रोख रकमेअभावी पाठ फिरविणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘पेटीएम’चे अॅप डाऊनलोड करुन घेतले अन् चमत्कार झाला. गेल्या महिनाभरापासून त्याच्या गाड्यावरील ग्राहक दुपटीने वाढला आहे. कारण एकच, लोकांकडे रोकड आणि अंडा आम्लेटच्या दुसऱ्या गाड्यावर कॅशलेसची सोय नाही. ‘चेतनच्या गाड्यावर पेटीएम आहे, अशी ग्राहकांनीच त्याची जाहिरात केली. आता लोकांकडे पैसा वाढल्यावर रोकड व्यवहारही वाढले आहेत. मात्र त्याच्याकडे पेटीएमवर पैसे जमा करणारे कमी झालेले नाहीत. त्याचा हा कॅशलेसचा व्यवहार ग्राहकांनाही सोयीचा ठरू लागला आहे.
गेल्या महिनाभरात तब्बल चार ते पाच हजार रुपये या पेटीएमच्या माध्यमातून त्याच्या बँकेच्या खात्यात जमा झाल्याचे, त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हॉटेलधारक, पानटपरीवाले, अंडा-आम्लेटचा व्यवसाय करणारे, पाणीपुरीच्या गाड्या इतकेच नव्हे तर भाजी विक्रेते या नाणेटंचाईने हैराण झाले होते. कॅशलेस व्यवहार होत असल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले़