जायकवाडी जलवाहिनीला गळती
By Admin | Updated: January 15, 2016 00:21 IST2016-01-15T00:00:58+5:302016-01-15T00:21:32+5:30
जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीयोजनेला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

जायकवाडी जलवाहिनीला गळती
जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पाणीयोजनेला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. काही ठिकाणी व्हॉल्व्ह तसेच पाईपच्या जॉइंटमधून गळती होत असल्याचे आढळून आले आहे.
शहराची पाणीटंचाई कामयस्वरूपी निकाली निघावी म्हणून दोन वर्षांपूर्वी सुमारे दोनशे कोटी रूपये खर्च करून ८० किलोमीटर जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. सुरूवातीला काही महिने पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर सद्यस्थितीत असंख्य ठिकाणी या जलवाहिनीला गळती लागली आहे. यात अंबडपासून पाहिल्यास अंबड येथील जय भवानी मंगल कार्यालयाजवळ, लालवाडी फाटा, पारनेर फाटा, गोलापांगरी जवळ चार ते पाच ठिकाणी तर मठपिंपळगावजवळही मोठी गळती सुरू आहे. काजळा फाट्यावर गळती लागल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. इंदेवाडी परिसर, जिल्हा कारागृह परिसरातून पाण्याची नासाडी होते आहे. बहुतांश ठिकाणी व्हॉल्व्ह नादुरूस्त झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. पाईपच्या जॉइंटमधूनही पाणी गळती होत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने जलवाहिनी कंत्राटदरामार्फत तयार केली. त्यामुळे ही जवाहिनी दुरूस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉल्व्ह दुरूस्तीमुळे जुना जालना भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद होता. परिणामी या भागातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे.
८० किलोमीटरच्या अंतरावर शेकडो ठिकाणी गळतीमुळे शहागड- जालना जलवाहिनीसारखी स्थिती होते का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. शहागड जलवाहिनीचीही देखरेखीअभावी चाळणी झाली होती. काही शेतकऱ्यांनीही ही जलवाहिनी फोडून पाणी वळविले होते. काही ठिकाणी जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. वास्तविक पाहता खडक फोडून भूमिगत जलवाहिनी अंथरणे गरजेचे होते. संबंधित कंत्राटदाराने ही जलवाहिनी जमिनीवर ठेवल्याने जॉइंटमधून पाणी वाहून जात आहे. उच्च दाबामुळे या जलवाहिनीतून चोवीस तास पाणी वाहत असते. अनेकदा व्हॉल्व्ह फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते. याचा फटका हजारो नागरिकांना बसतो. आगामी उन्हाळा पाहता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या जलवाहिनी दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दुरूस्ती केल्यास वाहून जाणारे लाखो
लिटर पाण्याची बचत होऊ
शकते. (प्रतिनिधी)