शहरात एलबीटीच राहणार सुरू!
By Admin | Updated: August 18, 2014 00:40 IST2014-08-18T00:26:13+5:302014-08-18T00:40:17+5:30
औरंगाबाद : महापालिका हद्दीमध्ये एलबीटीच सुरू राहणार असल्याचे स्पष्टीकरण खा.चंद्रकांत खैरे यांनी आज दिले.

शहरात एलबीटीच राहणार सुरू!
औरंगाबाद : महापालिका हद्दीमध्ये एलबीटीच सुरू राहणार असल्याचे स्पष्टीकरण खा.चंद्रकांत खैरे यांनी आज दिले. महापौर कला ओझा, सभापती विजय वाघचौरे, सभागृह नेते किशोर नागरे, जकातीसाठी विशेष सभेच्या मागणीसाठी पत्र देणाऱ्या नगरसेवकांची यावेळी उपस्थिती होती.
पदाधिकाऱ्यांनी चुकून जकात सुरू करण्यात येणार असल्याचे वक्तव्य केले असेल, तर ते वक्तव्य मनावर घेण्याची गरज नाही. पालिका हद्दीमध्ये एलबीटी कायम राहील, असे खा.खैरे म्हणाले. त्यांनी एलबीटीच सुरू राहणार असे ठणकावून सांगितल्यामुळे पदाधिकाऱ्यांचे चेहरे उतरले.
व्यापाऱ्यांनी एलबीटी आणि जकात या दोन्ही करप्रणालींना विरोध केलेला आहे. मात्र, नाईलाजाने त्यांनी एलबीटीचा पर्याय केवळ जकात अभिकर्त्याचा जाच नको म्हणून स्वीकारला; परंतु मनपातील सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एलबीटी हटवून जकातीकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये विश्वासघाताची भावना निर्माण झाली होती.
स्थायी समितीतील सर्वपक्षीय सदस्यांनी १४ आॅगस्ट रोजी महापौर कला ओझा यांना जकात सुरू करण्याच्या मागणीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्याच्या मागणीचे पत्रही दिले होते.
काशीनाथ कोकाटे, मीर हिदायत अली, प्रीती तोतला आणि संजय चौधरी या चार स्थायी समिती सदस्यांनी महापौरांना पत्र देऊन विशेष सभेची मागणी केली होती.
वरिष्ठ पातळीवरून खोडा
४२००६ मध्ये जकात वसुलीचे खाजगीकरण झाले. पहिल्या वर्षी खाजगी वसुलीतून १०१ कोटी मिळाले. ३० जून २०११ पर्यंत मनपाला जकातीतून ७०० कोटी रुपये मिळाले. १ जुलै २०११ पासून आजवर एलबीटीतून ६०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जकात बंद करून एलबीटी सुरू केला. एलबीटीकडून पुन्हा जकात सुरू करण्याचा प्रयत्न पालिकेने सुरू केला. मात्र, सेनेच्या वरिष्ठ पातळीवरूनच त्याला खोडा घालण्यात आला.
व्यापाऱ्यांतून तीव्र पडसाद
मनपा सत्ताधाऱ्यांनी एलबीटी बंद करून जकात सुरू करण्याच्या निर्णयावरून व्यापाऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. युती पदाधिकारी विश्वासघात करीत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली होती. सीएमआयएने १६ रोजी पत्रपरिषद घेऊन जकात सुरू करण्यास विरोध केला होता.