फेब्रुवारीनंतर लातूरच्या नळाला पाणी नाही; नळ कनेक्शन्स बनणार शोभेच्या वस्तू !
By Admin | Updated: December 23, 2015 23:54 IST2015-12-23T23:36:34+5:302015-12-23T23:54:54+5:30
लातूर : लातूरच्या पिण्याच्या पाण्याच्या अडचणीत आता आणखी बिकट होऊ लागल्या आहेत. फेब्रुवारीपर्यंत मांजराचे पाणी संपले तर

फेब्रुवारीनंतर लातूरच्या नळाला पाणी नाही; नळ कनेक्शन्स बनणार शोभेच्या वस्तू !
लातूर : लातूरच्या पिण्याच्या पाण्याच्या अडचणीत आता आणखी बिकट होऊ लागल्या आहेत. फेब्रुवारीपर्यंत मांजराचे पाणी संपले तर मार्चपासून लातूरकरांच्या घरातील नळ कनेक्शन्स् शोभेचे बनणार आहे. कारण त्यातून पाणीच येणार नसल्याचे पुरते स्पष्ट झाले आहे. तरीही आपण प्रयत्न करीत असल्याचा दावा करुन महापौर अख्तर शेख यांनी निम्न तेरणा योजना शासनाने मंजूर केल्यास आपल्याला आठ एमएलडी आणि नऊ वर्षांपासून बंद असलेली भंडारवाडी पाणीपुरवठा पुन्हा सुरु केल्यास दीड एमएलडी असे साडेनऊ एमएलडी पाणी नळ योजनेद्वारे देता येईल, असा दावा बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
शिवाय लातूरचा पाणी प्रश्न गंभीर असून यातून सर्व पक्षांनी एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी मिळून ‘एकच मागणी उजनीचे पाणी’ असा लढा उभारुन पाणी आणूया अशी भावनिक हाकही दिली.
ते पुढे म्हणाले की, लातूरच्या पाण्यावर महापालिकेने उजनीत आरक्षण टाकून ६८८ कोटीच्या योजनेला मंजुरी द्यावी, अशी मागणी घेऊन धरणे धरले. मुख्यमंत्र्यांनी त्यावर प्रविणसिंह परदेशी यांना व्यवहार्यता तपासण्याचे आदेश दिले आहेत. लातूरच्या पाणीप्रश्नांसाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आ. अमित देशमुख, खा. सुनील गायकवाड, आ. बसवराज पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. किणीकर यांच्यासह सर्वांनी प्रयत्न केले. त्यांचे मी मनापासून आभारी आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून लातूरच्या पाण्यासाठी उजनी योजनेला तत्काळ मंजुरी द्यावी. मांजरा धरणातील साठा फेब्रुवारीपर्यंत संपेल. त्यानंतर काय असा आमचा प्रश्न आहे. विभागीय आयुक्तांकडून आजच निम्न तेरणाचा प्रस्ताव पाणीपुरवठा मंत्र्यांच्या टेबलवर गेला आहे. तो मंजूर होऊन दोन महिन्यात पाईपलाईनचे काम झाल्यास लातूरकरांना दररोज आठ एमएलएडी पाणी मिळणार आहे. शिवाय नऊ वर्षांपासून बंद पडलेली भंडारीवाडी योजना रेणापूर पंप हाऊसजवळ २४ लाखाचे एक्सप्रेस फिडर बसवून चालविण्याची तयारी आहे. याचे १६ लाख रुपये रेणापूर ग्रामपंचायत तर उर्वरित रक्कम मनपा देणार आहे. असे झाल्यास आर्वीच्या जलकुंभापर्यंत दररोज दीड एमएलडी पाणी येईल. यातून लातूरकरांना आता २० दिवसातून देणाऱ्या १८ एमएलडीऐवजी २० दिवसातून दहा एमएलडी पाणी पुरवठा केला जाईल, असे ते म्हणाले.
आता भाजपा नेते काँग्रेसच्या पाण्याच्या प्रयत्नाबाबत टिका करित असल्याचे सांगत काँग्रेस शहराध्यक्ष मोईज शेख यांनी विरोधकांचे नाव न घेता टिका केली. गेल्या ४० वर्षात विलासराव देशमुखांनी लातूर - मुंबई रेल्वे, उड्डाणपूल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, मांजरा, विकास सारखे कारखाने आणून विकास केला, हे पहावे असा टोलाही त्यांनी लावला. महापालिकेने आणि काँग्रेसने सर्व भौतिक मार्ग हाताळले आहेत, पण निसर्गापुढे कोणाचे चालणार आहे ? असे म्हणून हा नैसिर्गक दुष्काळ असल्याचे सांगितले.
पत्रकारांनी आपल्या मनपाने रेन हार्वेस्टिंगसाठी काय केले ? या विचारलेल्या प्रश्नांवर महापौर शेख यांनी अनेक ठिकाणी यावर काम झाल्याचे सांगितले. नेमका आकडा विचारला असता सांगता येणार नसल्याचे सांगितले. यावर आता इथे उपस्थित असलेल्या महापौर, उपमहापौर, सभापती किंवा नगरसेवकांपैकी किती जणांच्या घरावर रेन हार्वेस्टिंग झाले आहे ? हा प्रश्न विचारल्यावर मात्र महपौर, उपमहापौर, सभापती आणि नगरसेवक अशा २५ जणांच्या ताफ्यातून सर्वांनीच चुप्पी राखली.