कोळगाव बँकेत शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी होतेय हेळसांड
By Admin | Updated: June 30, 2014 00:36 IST2014-06-30T00:23:15+5:302014-06-30T00:36:37+5:30
कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत आहे.

कोळगाव बँकेत शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी होतेय हेळसांड
कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत आहे. वारंवार खेटे घालूनही पीक कर्ज वेळेवर मिळत नसल्याने ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून कोळगावसह खडकी, माणकापूर, टाकळगव्हाण, तांदळा, काजळा, साठेवाडी, बंगाली पिंपळा, तिंतरवनी आदी वीस ते बावीस गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. पीक कर्जासाठी या बँकेत तब्बल महिनाभर शेतकऱ्यांना खेटे घालावे लागत असल्याचे तुकाराम घाडगे यांनी सांगितले. या बँकेतून शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्रही वेळेवर दिले जात नाहीत. यासाठीही शेतकऱ्यांना चार ते पाच तास बँकेत ताटकळत बसावे लागत असल्याचे सुनील धस यांनी सांगितले. या बँकेतून गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते. असे शेतकरी सध्या आपल्या घेतलेल्या पीक कर्जाचे नवे- जुने करीत आहेत. शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळावा यासाठी ३० जून अगोदर शेतकरी पीक कर्ज भरण्याची घाई करीत आहेत. वेळेत पीक कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनाही पुन्हा कर्ज देण्यासाठी बँकेकडून टाळाटाळ केली जात असल्याचे गुलाब लोंढे यांनी सांगितले.
पीक कर्ज भरल्यानंतर पुन्हा कर्जासाठी शेतकऱ्यांना तब्बल वीस ते पंचेवीस दिवस थांबावे लागत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज द्यावे व बेबाकी प्रमाणपत्रही तात्काळ देण्याची मागणी रायगड संघटनेचे रितेश ढगे, सुनील शेरकर, संतोष काळे, जिजा करांडे, शाम पाटील यांनी केली. या संदर्भात बँकेचे व्यवस्थापक तांदळे म्हणाले, नियमानुसार कर्जवाटप सुरू आहे. (वार्ताहर)
कोळगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून वीस ते बावीस गावातील शेतकऱ्यांना दिले जाते पीककर्ज.
पीक कर्ज भरल्यानंतरही नवीन कर्जासाठी शेतकऱ्यांना थांबावे लागते वीस ते पंचवीस दिवस.
तात्काळ कर्ज देण्याची मागणी.