बहुतांश गावांत खांदेपालट
By Admin | Updated: August 7, 2015 01:14 IST2015-08-07T01:08:44+5:302015-08-07T01:14:08+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३७९ ग्रामपंचायतींची मतमोजणी गुरूवारी सकाळी पार पडली. आठही तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत

बहुतांश गावांत खांदेपालट
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३७९ ग्रामपंचायतींची मतमोजणी गुरूवारी सकाळी पार पडली. आठही तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत मोठे उलटफेर झाले असून, काही ग्रामपंचायतींतील मागील दहा-वीस वर्षांपासूनच्या सत्तेत मतदारांनी बदल केल्याचे दिसून आले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोषात मिरवणुका काढण्यात आल्या. उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि), बोरखेड्यासह खामगाव ग्रामपंचायतीत सत्ताबदल झाला. याच पध्दतीने भूम तालुक्यातील ईट, पाथरूड, पखरूड, उमरगा तालुक्यातील मुळज, जकेकूर, बोरी, नागराळ तसेच तुळजापूर तालुक्यातील मंगरूळसह अनेक गावांत ग्रामस्थांनी नव्या कारभाऱ्यांना संधी दिली. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपासह इतर पक्षांनीही अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविल्याचा दावा केला असला तरी कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या, याचे चित्र सरपंच निवडीनंतरच स्पष्ट होणार आहे.
तुळजापुरात काँग्रेस- राष्ट्रवादीचे वर्चस्व
तुळजापूर : तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या मतदानाची मतमोजणी गुरूवारी केवळ चार तासात पूर्ण झाली़ काँग्रेस- राष्ट्रवादीने आपले तालुक्यातील वर्चस्व कायम ठेवल्याचे निकालातून स्पष्ट झाले असून, भाजपा-शिवसेनेला मोजक्या जागांवर विजय मिळाला आहे़ माजी जिप सदस्य मुकुंद डोंगरे, जि़प. अध्यक्ष धीरज पाटील, भाजपाचे भिमाशंकर हासुरे, पंस सदस्य साहेबराव घुगे यांच्या पॅनलला मतदारांनी नाकारले़ तर जि़प़सदस्य महेंद्र धुरगुडे, काशिनाथ बंडगर, भाजपाचे तालुकाध्यक्ष विजय शिंगाडे, माजी जि़प़सदस्य गणेश सोनटक्के यांनी आपापल्या ग्रामपंचायतीवर ताबा मिळविला़ तर अणदूर येथे काँग्रेसचा दणदणित विजय झाला़
सिंदफळ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते अजय मिसाळ यांच्या ग्रामविकास कामगार पॅनलने १३ पैकी १० जागांवर विजय मिळवून विरोधकांचा सफाया केला़ मंगरूळ ग्रामपंचायत निवडणुकीत मुकुंद डोंगरे, सुरेश डोंगरे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला़ धुरगुडे-खोपडे- सरडे यांच्या पॅनलने ११ पैकी ९ जागांवर विजय मिळविला़ कसई ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे तालुकाध्यक्ष विजय शिंगाडे यांच्या पॅनलने ७ पैकी ५ जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली़ जळकोट ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना प्रणित गणेश सोनटक्के यांच्या पॅनलने १४ पैकी १४ जागा जिंकून विरोधकांचा पूर्णत: धुव्वा उडविला़ सोनटक्के यांच्या पॅनलने सलग चौथ्यावेळेस विजय मिळवून ग्रामपंचायत ताब्यात ठेवली आहे़ येवती, आरळी (बु), गंधोरा ग्रामपंचायतीवर काँग्रेस प्रणित अनिल शिंदे, रोहिदास शिंदे यांच्या पॅनलने सर्वच ९ जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली़
या निवडणुकीत देवराज मित्रमंडळाचा दारूण पराभव झाला़ आरळी (बु़) येथे काशिनाथ बंडगर यांच्या पॅनलने ९ पैकी ५ जागा मिळविला़ तर गंधोरा ग्रामपंचायतीत प्रभाकर भोसले यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व ९ जागा जिंकल्या़ वडगाव ग्रामपंचायतीवर देवकते गुरूजी काँग्रेस प्रणित पॅनलने ७ जागांवर विजय मिळविला़ दहिवडी ग्रामपंचायतीत अंबुरे पॅनलने ९ पैकी ८ जगांवर विजय मिळविला़ हंगरगा नळ येथे ११ पैकी ९ जागा जिंकून काँग्रेस प्रणित पॅनलने ग्रामपंचायतीवरील वर्चस्व कायम राखले़ (वार्ताहर)
उमरगा : उमरगा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अनपेक्षित मुसांडी मारली तर प्रस्थापित काँग्रेसच्या पदरात निराशा पडली. शिवसेनेला बालेकिल्ला राखण्यात यश आले तर भाजपालाही नजरेत भरणारे यश मिळाल्याचे गुरूवारी मतमोजणीनंतर स्पष्ट झाले.
उमरगा शहरातील अंतुबळी सभागृहात सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. निवडणूक निकालासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. निकाल ऐकलेल्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जल्लोष सुरू होता. काही विजयी उमेदवारांनी निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण करीत मिरवणुकाही काढल्या.
राष्ट्रवादीने सावळसूर, दाळींब, नाईचाकूर, बाभळसूर, दगडधानोरा, समुद्राळ, बेडगा, बलसूर, मुरळी या गावात वर्चस्व सिद्ध केले. तालुक्यातील कडदोरा, कुन्हाळी, हिप्परगाव, मातोळा, नाईकनगर, वागदरी, भगतवाडी, गणेशनगर आदी गावात विविध पक्ष मिळून सत्ता स्थापन केली. शिवसेनेने ग्रामीण भागातील वर्चस्व अबाधित राखत तुरोरी, कदमापूर, दूधनाळ, भिकारसांगवी, सावळसूर, कराळी, कोळसूर, कवठा, एकोंडी, जगदाळवाडी, गुरूवाडी, चेंडकाळ, गुगळगाव, हिप्परगाव, पळसगाव, आष्टा (ज.) या गावात बहुमत सिद्ध केल्याचा दावा केला आहे. व्हंताळ, दाळींब, कोळसूर (गुं.), नाईकनगर, जवळगाबेट, कडदोरा, हंद्राळ आदी गावात इतर पक्षासोबत युती करून सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीत यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. मुळज, जकेकूर, बोरी, नागराळ या गावात भाजपाने एकहाती सत्ता मिळविली आहे. (वार्ताहर)
येरमाळा : अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या येरमाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने ८ जागांवर विजय मिळवून विजयाची हॅट्ट्रीक साधली आहे. शिवसेनेच्या पॅनलनेही चिवट झुंज देत मागील निवडणुकीपेक्षा ३ जागा वाढविण्यात यश मिळविले आहे.
१३ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वार्ड क्रमांक १ मधील विकी बाळू वाघमारे, उषा सतीश मोरे, वार्ड क्र. ३ मधील छाया संजय मोहीते, दशरथ गिड्डापा जाधव, वनमाला चंद्रकांत बारकूल तर वार्ड क्र. चारमधून विकास किसनराव बारकूल, वनमाला भास्कर कळसाईत, तब्बसुम रफीक सय्यद तर शिवसेनेचे वार्ड २ मधील सुनील शहाजीराव पाटील, रुपाली पांडूरंग वेदपाठक तर वार्ड क्रमांक ५ मधून अमोल बापूसाहेब पाटील, वैशाली विलास थोरबोले आणि परशुराम अंकुश गुरव हे उमेदवार विजयी झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)