खामनदीचा घोटला गळा

By Admin | Updated: June 15, 2014 00:55 IST2014-06-15T00:49:11+5:302014-06-15T00:55:17+5:30

प्रशांत तेलवाडकर, साहेबराव हिवराळे , औरंगाबाद देशातील प्रमुख नद्या स्वच्छ करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे.

Khamdani choke hit | खामनदीचा घोटला गळा

खामनदीचा घोटला गळा

प्रशांत तेलवाडकर, साहेबराव हिवराळे , औरंगाबाद
देशातील प्रमुख नद्या स्वच्छ करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. याच धर्तीवर औरंगाबादेतील नद्यांची काय स्थिती आहे, याची पाहणी केली असता एकेकाळी शहराची जीवनवाहिनी असलेल्या खाम नदीचा गळाच घोटला गेला आहे. खाम नदीच्या पाण्यावरच शहराची तहान भागवली जात असे; पण जायकवाडीचे पाणी शहरात आले आणि काळाच्या ओघात खाम नदीचे गटार कधी झाले, हे कळालेच नाही. खाम नदीची परिक्रमा करीत असताना जागोजागी नदीपात्रात वीटभट्ट्यांचे अतिक्रमण झालेले आढळून आले. येथे अवैधरीत्या वाळू, माती, पाणी उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नदीच्या पात्रातून चोरीछुपे कोट्यवधींची उलाढाल केली जात आहे. बाकी शिल्लक राहिलेल्या पात्रात ड्रेनेज लाईन सोडल्याने ‘गंगा मैली’ झाली आहे.
हर्सूल तलावापासून पश्चिमेकडे खाम नदी वाहत जाते. या नदीपात्रात जागोजागी अवैधरीत्या वीटभट्ट्या सुरू आहेत. ३० ते ४० वीटभट्ट्या सुरू असलेल्या आढळून आल्या. याच पात्रात अनेक ठिकाणी वाळूचे मोठे साठे करून ठेवल्याचे दिसून आले. दिवसभरात बेसुमार वाळूचा उपसा करून दररोज ट्रॅक्टरच्या ७० ते ८० फेऱ्या येथून होत आहेत. याशिवाय भर टाकून नदीचे पात्र काही ठिकाणी निमुळते करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी शेती तर काही ठिकाणी घरांचे बांधकाम केल्याचे आढळून आले आहे.
हिलालनगर परिसरात मात्र, नदीच्या दोन्ही बाजूला कठडे बांधून नदीपात्र मोठे केले. मकाईगेट, घाटी, पाणचक्की, सिद्धार्थ गार्डन, छावणीपर्यंत अतिक्रमण आढळून आले नाही. मात्र, कर्णपुरा, बनेवाडी ते ब्रह्मगव्हाणपर्यंत काही शेतकऱ्यांनी नदीपात्रात माती टाकून पात्र लहान केले व तिथे शेती करताना दिसून आले, तसेच खाम नदीवर विहीर खोदून त्याचे पाणी दुसऱ्या विहिरीत नेत या पाण्याचा व्यवसायही काही जण करीत असल्याचे पाहणीत निदर्शनात आले. संपूर्ण खाम नदीच्या पात्रात ड्रेनेजचे पाणी सोडण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी चेंबर फोडण्यात आले, तसेच या नदीपात्रात शौचास जाणारे महाभागही काही कमी नाहीत. काही कंपन्यांचे रसायनयुक्त पाणीही याच नदीत सोडण्यात आले आहे. शहराची लोकसंख्या आज १५ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. येत्या १० वर्षांत संख्या दुप्पट होईल. याकरिता जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून न राहता ओहर नदी, खाम नदी, सुखना नदी या नद्यांचे पुनरुज्जीवन व पुनर्बांधणी करणे व या नद्यांची स्वच्छता करून ते पाणी पिण्यासाठी वापरता येईल, असे नियोजन करणे आवश्यक बनले आहे.
जलशुद्धीकरणावर दरमहा १० लाख रुपये खर्च
खाम नदीतून सुमारे १०० एमएलडी ड्रेनेजमिश्रित पाणी जायकवाडी धरणाला ब्रह्मगव्हाण येथे जाऊन मिळते. ब्रह्मगव्हाण येथे एमआयडीसीची जॅकवेल यंत्रणा बसविण्यात आली आहे. एमआयडीसीचे ५०० हॉर्सपॉवर क्षमतेने पाणी उचलण्यात येते. जॅकवेल यंत्रणा पाण्याचे शुद्धीकरण करीत आहे.या शुद्धीकरणावर एमआयडीसीला दरमहा १० लाख रुपये खर्च करावा लागतो. एमआयडीसीतर्फे रेल्वेस्टेशन, वाळूज, चिकलठाणा औद्योगिक वसाहत तसेच शेंद्रा पंचतारांकित आणि जालना येथील औद्योगिक वसाहतीत हा पाणीपुरवठा करण्यात येतो.
मैलायुक्त, सांडपाणी कोणत्या नाल्यातून खाम नदीत सोडण्यात आले?
मजनू हिल नाला, किराडपुरा नाला, बायजीपुरा नाला आणि खोकडपुरा नाला, औरंगपुरा नाला, समर्थनगर नाला हे नाले उत्तरेकडून नैऋत्य दिशेने वाहत जाऊन एकत्र येतात आणि छावणी पुलाजवळ खाम नदीला मिळतात.

बेगमपुरा नाला, भावसिंगपुरा नाला, पडेगाव नाला आणि मिटमिटा नाला हे पश्चिमेकडील चार नाले एकत्र येऊन तीसगाव येथे मोठा नाला तयार झाला आहे. हा नाला शहराच्या नैऋत्येस पंढरपूर गावाजवळ खाम नदीला मिळतो.

उस्मानपुरा नाला, गारखेडा नाला आणि सातारा नाला हे तीन नाले शहराच्या दक्षिणेकडून नैऋत्येकडे वाहत जाऊन गोलवाडीनजीक खाम नदीत मिसळतात.
पात्रात वाळूउपसा आणि वीटभट्ट्यांचा धंदा जोरात
औरंगाबाद : खाम नदीच्या उगमापासून ते शेवटपर्यंत ही नदी नाला बनली आहे. नदीपात्रात वाळूउपसा, पाणीचोरी आणि वीटभट्ट्या, गाळपेऱ्याचा भूखंड तोडून त्यावर शेतीही केली जात आहे.
७० ते ८० किलोमीटरची खाम नदी डोंगरातून उगम पावली असली तरी ती हर्सूल तलावापासूनच पुढे आली असल्याचे दिसते. शहराला वेढा घालत नदी कर्णपुरा- सादातनगर- गोलवाडी- वळदगाव- पंढरपूर- नायगाव- वाळूज- नारायणपूर- लांझी- शिवराई- पिंपरखेडामार्गे सावखेडा- शेंदूरवादा आणि ब्रह्मगव्हाण येथे पोहोचते. पावसाळ्यात या नदीला आलेला पूर हा ब्रह्मगव्हाण येथे एमआयडीसीच्या पाणीउपसा केंद्राजवळ पोहोचतो; परंतु रस्त्यात अनेक ठिकाणी शेतकरी गाळपेऱ्यावर ऊस, भाजीपाला इत्यादी पिके घेतात. शहरातून वाहणारे ड्रेनेजचे पाणी दहा व पाच एचपीच्या वीज मोटारी टाकून उपसले जात आहे. याविषयी महसूल विभागाकडे शेतकऱ्यांच्या ताब्यातील जमिनीपेक्षा अधिक शेती ताब्यात असून, त्याकडे भूमी अभिलेख, महसूल विभाग, जीटीएल, महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.
हिमायत बागेच्या दक्षिणेला खाम नदीपात्र शोधूनही सापडत नाही. कारण या नदीचा मार्गच बदलला असल्यामुळे नदीत वर्षानुवर्षे साठलेली हजारो ब्रॉस वाळू वाळूतस्करांच्या नजरेला पडली आणि राजरोसपणे त्यांनी वाळूचोरी सुरू केली आहे. शहरातील बांधकामांसाठी ही वाळू वापरली जाते. ‘लोकमत’ची टीम खाम नदीची परिक्रमा करीत गेली असता, ट्रॅक्टर व रिक्षाचालकांनी आपली वाहने येथून दामटण्याचा प्रयत्न केला. वाळूचा थर नदीपात्रापासून जमिनीला टेकला आहे.
त्यावर काही वाळूमाफियांनी लक्ष केंद्रित करून जोरात कमाई सुरू केली आहे. पावसाचे प्रमाणही कमी असल्यामुळे मोकळ्या जागांवर जवळपास २२ वीटभट्ट्याही सुरू झाल्या आहेत. नदीपात्रात माती, मुरूम टाकून शेतीही उजळमाथ्याने केली जात आहे. अनेकांनी अतिक्रमण करून परिसरातील रस्ते, पायवाटा गिळून टाकल्या आहेत. या गंभीर अतिक्रमणांकडे कोणीही लक्ष देत नाही.
शेतकऱ्यांनी रस्ते वाढवून त्याला काटेरी कुंपण घातले आहे. पादचारी नाइलाजाने नदीपात्रातूनच ये-जा करतात.

Web Title: Khamdani choke hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.