शेतातील विहिरीत बुडून पती-पत्नीचा करुण अंत
By Admin | Updated: May 26, 2014 01:17 IST2014-05-26T01:10:29+5:302014-05-26T01:17:46+5:30
अजिंठा : सारोळा (ता. सिल्लोड) येथे रविवारी दुपारी विहिरीतून पाणी काढून बैलांना पाजताना बैलाचा धक्का लागून पत्नी विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी पतीने विहिरीत उडी मारली.

शेतातील विहिरीत बुडून पती-पत्नीचा करुण अंत
अजिंठा : सारोळा (ता. सिल्लोड) येथे रविवारी दुपारी विहिरीतून पाणी काढून बैलांना पाजताना बैलाचा धक्का लागून पत्नी विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी पतीने विहिरीत उडी मारली. दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही मृत्यू झाला. वंदना कृष्णा साळवे (२६) व कृष्णा रामा साळवे (३४) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. सारोळा येथील खरकाडी शिवारात कौतिक राघो समिंद्रे यांच्या गट क्रमांक ११८ या शेतातील विहिरीवर कृष्णा साळवे यांनी बैलांना पाणी पाजण्यासाठी आणले. कृष्णा यांची पत्नी वंदना ही पाणी काढत असताना बैलाचा धक्का लागून ती विहिरीत पडली. पत्नी विहिरीत पडल्यानंतर तिला वाचविण्यासाठी लगेच कृष्णा साळवे यांनी विहिरीत उडी मारली; परंतु दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही मृत्यू झाला. या दाम्पत्याला दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. सारोळा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय रामराव वराडे यांनी या घटनेबाबत अजिंठा पोलीस स्टेशनला कळविले. या घटनेचा पुढील तपास अजिंठा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. शंकर शिंदे करीत आहेत. कठडे नसलेल्या विहिरी भरउन्हातच या बैलांना पाणी पाजताना या दाम्पत्यालाही बहुधा विहिरीला कठडे नसल्याचे भान राहिले नसावे. आपल्या तंद्रीतच ते पाणी उपसून पाजत असताना बैलाचा धक्का लागल्याने पहिल्यांदा पत्नी विहिरीत पडली. त्यापाठोपाठ तिला वाचविण्यासाठी पतीनेही मागचा पुढचा विचार न करता विहिरीत उडी मारली. त्यामुळे या दोघांनाही आपल्या जीवास मुकावे लागले. या भागात कठडे नसलेल्या अनेक विहिरी आहेत.