अंतर्गत रस्तेही खराब
By Admin | Updated: September 26, 2016 00:17 IST2016-09-25T23:43:35+5:302016-09-26T00:17:26+5:30
बीड : परतीच्या मार्गावरील पावसाने रविवारी तिसऱ्या दिवशी सुटी घेतली. त्यामुळे दोन दिवस पाण्याखाली गेलेले रस्ते अखेर ‘उघडे’ पडले. सगळीकडेच रस्त्यांची पुरती ‘वाट’ लागली

अंतर्गत रस्तेही खराब
बीड : परतीच्या मार्गावरील पावसाने रविवारी तिसऱ्या दिवशी सुटी घेतली. त्यामुळे दोन दिवस पाण्याखाली गेलेले रस्ते अखेर ‘उघडे’ पडले. सगळीकडेच रस्त्यांची पुरती ‘वाट’ लागली असून शहरातून जाणाऱ्या धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची अक्षरश: चाळणी झाली आहे. आधीच या महामार्गावर खड्डे होते, पावसाने त्यात भर पडली, शिवाय पाणी साचून राहिल्याने आकारही वाढला. त्यामुळे वाहनचालकांची त्रेधातिरपीट सुरु आहे.
शहरातून गेलेल्या महामार्गावरील चार किमी अंतरावर पडलेले खड्डे चुकविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या मार्गावरुन जाताना हा राष्ट्रीय महामार्गच आहे का? असा प्रश्न वाहनचालकांना पडल्यावाचून राहत नाही. या मार्गावरील खड्ड्यांची समस्या नित्याची बनली आहे;परंतु सलग दोन दिवसांच्या पावसाने खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांत वाहने आदळून दुचाकीस्वारांना पाठ, मणक्याचे त्रास होऊ लागले आहेत.
चारचाकी वाहनांचे सुटे भाग निखळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. वाहनचालकांप्रमाणेच पादचाऱ्यांनाही कसरत करावी लागत आहे. बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व शाहूनगर रोड ते वळणरस्ता इथपर्यंत असंख्य खड्डे आहेत. अल्पशा पावसातही पाणी साचत असल्याने ते ओळखणेही कठीण बनत आहे. शाहूनगर रोड ते सेंट अॅन्स स्कूलपर्यंतचा महामार्ग दोन दिवस पाण्याखाली होता. खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वार महिला व मुलींना होतो. (प्रतिनिधी)
वाहतूक वळवली तरीही..
४बार्शी रोडवरील बिंदुसरा नदीवरील निजामकालीन पूल कालबाह्य झाल्याने जडवाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहरात वाहनसंख्या नियंत्रित राहील. मात्र, खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळू शकते, अशी स्थिती आहे. एकूणच वाहतूक वळविल्यानंतरही महामार्गामागचे ग्रहण कायम आहे.
शहरातील पेठ बीड, धानोरा रोड, आदित्यनगरी, एकनाथनगर, पिंपरगव्हाण रोड, शाहूनगर, मोमीनपुरा, करीमपुरा, सुभाष रोड, मोंढा, स्वराज्यनगर, धांडेगल्ली, भाजीमंडई, पोलीस कॉलनी या भागातील रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. पावसाने नागरिकांची तारांबळ उडत असून खड्ड्यांतील पाणी अंगावर उडून येत असल्याने वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत.