बियाण्यांच्या ३० नमुन्यांची तपासणी
By Admin | Updated: May 23, 2014 00:24 IST2014-05-23T00:08:28+5:302014-05-23T00:24:50+5:30
हिंगोली : खरीप हंगामात पेरल्या जाणार्या बियाण्यांतील ३० नमुने कृषी विभागाने तपासले असून त्यात २० नमुने सोयाबीनचे आहेत.

बियाण्यांच्या ३० नमुन्यांची तपासणी
हिंगोली : खरीप हंगामात पेरल्या जाणार्या बियाण्यांतील ३० नमुने कृषी विभागाने तपासले असून त्यात २० नमुने सोयाबीनचे आहेत. यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचा काळा बाजार होण्याची शक्यता असल्याने गुणनियंत्रकाकडून सोयोबीनच्या बियाण्यांवर अधिक भर दिला जात आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण ३ लाख ६० हजार ९७८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. पेरणीयोग्य क्षेत्रात यंदा १ लाख ९१ हजार ७२७ क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. गतवर्षी १ लाख २० हजार पैकी ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. यंदा त्यात आणखीच घट होण्याची शक्यता असल्याने केवळ ९६ हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. दुसरीकडे ३२ वरून २७ हजार हेक्टवर तूर, १७ वरून १३ हजार हेक्टरवर मुगाचे क्षेत्र यंदा घसरले आहे. इतर पिकांचा पेरा घटून सोयाबीनचा पेरा ३९ हजार हेक्टरने वाढला आहे. वाढलेल्या क्षेत्रासाठी जिल्ह्यात सोयाबीनच्या बियाण्यांची उपलब्धता नाही. जवळपास ४० हजार क्विंटल सोयाबीनची कमतरता भासण्याची शक्यता आहे. परिणामी सोयाबीनच्या बियाण्याचा काळा बाजार होण्याची शक्यता आहे. कंपन्यांच्या नावाखाली बनावट बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता आहे. म्हणून जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार कृषी विभागाच्या गुण नियंत्रकाकडून बियाण्यांची तपासणी केल्या जात आहे. एप्रिल महिन्यापासून बियाण्यांचे नमुने तपासले जात आहेत. त्यात गुरूवारपर्यंत एकूण ३० नमुने घेण्यात आले आहेत. बियाण्यांच्या लॉटमध्ये रॅण्डम पद्धतीनुसार हे नमुने काढले जात आहेत. काढलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले आहेत. सध्या ३० पैकी २० नमुने सोयाबीनच्या बियाण्यांचे घेण्यात आले आहेत. उर्वरित कापूस, तूर आदी पिकांच्या बियाण्यांचे मिळून १० नमुने आहेत. जिल्ह्यातील पाचही तालुक्यात प्रत्येकी १ गुणनियंत्रक नेमण्यात आला आहे. प्रत्येकाला उद्दीष्ट देण्यात आले असून गुणनियंत्रकाकडून लॉटनिहाय नमुने तपासणीला पाठविल्या जात असल्याची माहिती संजय नाब्दे यांनी दिली. (प्रतिनिधी)