रोहयोत स्वयंसेवी संस्थांचा शिरकाव
By Admin | Updated: December 2, 2014 01:08 IST2014-12-02T00:56:18+5:302014-12-02T01:08:07+5:30
औरंगाबाद : बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत आता

रोहयोत स्वयंसेवी संस्थांचा शिरकाव
औरंगाबाद : बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत आता औरंगाबाद जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांचाही शिरकाव होणार आहे. रोहयोंतर्गत स्वयंसेवी संस्थेच्या तांत्रिक सहभागातून पाणलोट क्षेत्राच्या विकासाची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनुभवी संस्थांकडून अर्ज मागविले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायती तसेच कृषी, जलसंधारण खात्यांमार्फत केली जातात. याअंतर्गत रस्ते, पाझर तलाव, सिमेंट नाला बांध, शौचालय, खेळाची मैदाने, विहिरी, शेततळे आदी कामे घेण्याची तरतूद आहे. रोहयोसाठी एकूण खर्चापैकी ६० टक्के खर्च मजुरांवर आणि ४० टक्के खर्च साधनसामग्रीवर व्हावा, असा नियम आहे. आता यापुढे रोहयोच्या कामात स्वयंसेवी संस्थांचा तांत्रिक सहभाग घेण्यात येणार आहे. त्यासाठी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो शाखेच्या वतीने अनुभवी स्वयंसेवी संस्थांकडून १० डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले आहेत.
याविषयी उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांना विचारले असता त्या म्हणाल्या, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या तांत्रिक सहभागातून सूक्ष्म पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय शासनानेच घेतला आहे. त्यानुसार आम्ही स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविले आहेत.