भारत-बांगलादेश सीमा चर्चा प्रथमच दिल्लीबाहेर होणार

By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:38+5:302020-12-04T04:12:38+5:30

नवी दिल्ली : भारत-बांगलादेशची महासंचालक स्तरावरील सीमा चर्चा या महिन्यात गुवाहाटीमध्ये होणार आहे. दरवर्षी दोनदा होणारी ही चर्चा दिल्लीबाहेर ...

India-Bangladesh border talks will be held outside Delhi for the first time | भारत-बांगलादेश सीमा चर्चा प्रथमच दिल्लीबाहेर होणार

भारत-बांगलादेश सीमा चर्चा प्रथमच दिल्लीबाहेर होणार

नवी दिल्ली : भारत-बांगलादेशची महासंचालक स्तरावरील सीमा चर्चा या महिन्यात गुवाहाटीमध्ये होणार आहे. दरवर्षी दोनदा होणारी ही चर्चा दिल्लीबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व त्यांचे समकक्ष बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) यांच्यात ५१वी उच्चस्तरीय चर्चा २२ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. या चर्चेत दोन्ही देश सीमेवरील गुन्हे रोखणे तसेच दोन्ही देशांतील सहकार्य वाढविण्यावर चार दिवस चर्चा करतील. आसामची राजधानी बीएसएफच्या गुवाहाटी फ्रंटियरचे मुख्यालय आहे. या जवानांवर भारत-बांगलादेशाच्या एकूण ४०९६ किलोमीटर लांबीच्या सीमेपैकी ४९५ किलोमीटर सुरक्षेची जबाबदारी आहे. ही सीमा आसाम व पश्चिम बंगालच्या काही भागांनाही लागून आहे.

बीएसएफची विशेष जल शाखा आसाममध्ये धुबरीसह सीमावर्ती भागांना लागून असलेल्या नद्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे. त्याचेही काम याच मुख्यालयांतर्गत चालते.

१९९३मध्ये सुरू झालेली ही चर्चा दिल्लीबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीमेजवळ होत असलेल्या या बैठकीदरम्यान दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आसामच्या काही सीमावर्ती भागांचा संयुक्त दौरा करण्याची संधीही मिळू शकते. त्यामुळे येथे त्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये बीएसएफ महासंचालक राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ या चर्चेसाठी ढाक्यात गेले होते. सूत्रांनी सांगितले की, बीजीबीचे समकक्ष मेजर जनरल शफीनुल इस्लाम यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेचे नेतृत्व अस्थाना करतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही देश व सुरक्षा दलांमध्ये सध्या चांगले संबंध आहेत व दोन्ही बाजूंनी हे संबंध बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

मागील बैठकीत अस्थाना यांनी म्हटले होते की, सीमेवर गुन्हेगार ठार होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. भारताचे जवान सीमापारच्या असामाजिक तत्त्वांकडून धोका निर्माण झाल्यावरच गोळीबार करतात. सीमेवर गुन्हेगाराचा मृत्यू किंवा त्याला पकडले जाण्याशी नागरिकतेविषयी संबंध नाही.

........................

या विषयांवर होणार चर्चा

१) भारत-बांगलादेश संयुक्त सीमा सुरक्षा व्यवस्थापन.

२) कुंपण नसलेल्या भागांमध्ये कुंपण घालणे.

३) सीमेपलीकडून होणाऱ्या गुन्ह्यांना लगाम घालणे.

४) सीमेवर काही जणांची हत्या.

Web Title: India-Bangladesh border talks will be held outside Delhi for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.