पाऊस नसल्याने तापमानात वाढ
By Admin | Updated: August 7, 2014 23:33 IST2014-08-07T23:12:58+5:302014-08-07T23:33:20+5:30
पाऊस पडत नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे.

पाऊस नसल्याने तापमानात वाढ
केज: पावसाळा सुरू झाला, मात्र पाऊस नाही. ढग दाटून येतात, मात्र जोराच्या वाहत्या वाऱ्यामुळे वातावरण पुन्हा सामान्य होते. पाऊस पडत नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकही पाणी नसल्यामुळे चिंतातूर झाले आहेत.
जून महिन्यात पाऊस होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या होत्या. पेरण्यांसाठी शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढले तर काही शेतकऱ्यांनी खाजगी कर्ज घेतले. मात्र पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. त्यानंतर ७ जुलै रोजी पावसाला सुरुवात झाली. या दरम्यानच्या कालावधीत तीन-चार मोठे पाऊस पडले. याच पावसावर शेतकऱ्यांनी पुन्हा पेरण्या घेतल्या. बियाण्यांची उगवण होताच पुन्हा पावसाने दडी मारली. यामुळे उगवलेली रोपे वाचविण्याचे जणू आव्हानच शेतकऱ्यांसमोर उभे राहिले. त्यामुळे त्यांनी गावांमधून पाणी आणून रोपांना टाकले. पाऊस नसल्यामुळे केवळ शेतकरीच त्रस्त आहेत अशातला भाग नाही. सामान्य नागरिकही चिंतातूर झालेला आहे. दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट बनत चालली आहे. त्याचा परिणाम आर्थिक बाबीवरही होणार असल्याचा अंदाज येत असल्यामुळे अनेकजण चिंताग्रस्त झाले आहेत. केज तालुक्यातील अनेक भागामध्ये नभ दाटून येत आहेत. मात्र वेगाने वाहत असलेल्या वाऱ्यामुळे आलेले ढग निघून जात आहेत. वातावरण पुन्हा कोरडेठाक होते. ढग नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. महसूल कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार तापमान २८ ते ३२ अंशाच्या आसपास नोंदविले जात आहे. पावसाळ्यात तापमान २४ ते २६ अंशाच्या आसपास असते. मात्र पाऊस नसल्याने वातावरण कोरडे झाले आहे. परिणामी तापमानही वाढत चालले आहे. पाऊस झाल्यास हवेत आर्द्रता निर्माण होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत नाही. यामुळे गेल्या दहा दिवसांत तापमान वाढत चालले आहे. गेल्या तीन दिवसांत तापमान ३२ अंशावर जाऊन पोहचले आहे. यावरुन तापमान वाढत असल्याचे लक्षात येते. (वार्ताहर)