लातूर : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून अनधिकृत ३८ नळजोडणी तोडण्यात आल्या आहेत़ अनधिकृत जोडणी अधिकृत करून देण्यात येत आहे, त्यासाठी अर्ज करावा़ मनपाच्या मोहिमेत अनाधिकृत जोडणी आढळून आल्यास सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा ठपका ठेऊन गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबी मनपा प्रशासनाने सोमवारी दिली आहे़ पाणीटंचाई निवारणासाठी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या तोडण्याचे आदेश महापौर अख्तर शेख यांनी बजावले होते़ यासंदर्भात आयुक्त सुधाकर तेलंग यांनी शुक्रवारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली़ दोन दिवसांत मुख्य जलवाहिनीवर असलेले ३८ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत़ ज्या नळधारकांना कनेक्शन अधिकृत करून घ्यावयाचा आहे, त्यांनी २१ आॅगस्टपर्यंत मनपाकडे रितसर अर्ज करावा़ त्यानंतर मीटर बसवून अधिकृत जोडणी देण्याची तयारी मनपाने दर्शविली आहे़ पाण्याचा वापर नागरिकांनी काटकसरीने करावा, असे आवाहनही मनपा प्रशासनाने केले आहे़ पाणी गळतीची ठिकाणे शोधून ते बंद करण्यासाठी मनपाचे कर्मचारी लागले आहेत़ नागरिकांनाही गळती आढळून आल्यास त्वरीत मनपा कर्मचारी अथवा क्षेत्रिय कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे़ अनधिकृत नळजोडण्या शोधण्याचे काम सुरू आहेत़ यासाठी संंबंधित विभागातील क्षेत्रीय अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता व ४ कर्मचारी कामाला लागले आहेत़ अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करून घेण्यासाठी आता नळाला मीटर बसविण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
तर फौजदारी गुन्हे दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 00:53 IST