हातउसने पैसे घेऊन बोअर घेतला, पण तोही फेल गेला...

By Admin | Updated: January 9, 2015 00:51 IST2015-01-09T00:32:18+5:302015-01-09T00:51:00+5:30

औसा : पाऊस नसल्यामुळे शेतात पिकलं नाही. हातउसने पैसे घेऊन बोअर घेतला. मात्र तोही फेल गेला. संसाराचा गाडा चालवायचा कसा अन् मुला-बाळांचं शिक्षण करायचं कसं?

Hook took the money from the Boar, but he also failed ... | हातउसने पैसे घेऊन बोअर घेतला, पण तोही फेल गेला...

हातउसने पैसे घेऊन बोअर घेतला, पण तोही फेल गेला...


औसा : पाऊस नसल्यामुळे शेतात पिकलं नाही. हातउसने पैसे घेऊन बोअर घेतला. मात्र तोही फेल गेला. संसाराचा गाडा चालवायचा कसा अन् मुला-बाळांचं शिक्षण करायचं कसं? या विवंचनेत औसा तालुक्यातील लोदगा येथील तरुण शेतकरी प्रभाकर रघुनाथ भारती यांनी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
वडील रघुनाथ भारती यांच्या नावावर ६ एकर कोरडवाहू जमीन आहे. त्यांचे वय झाले असून, प्रभाकर भारती हे शेती पहायचे. शेतात काहीच पिकलं नसल्यामुळे मजूरी करायची. गेल्यावर्षी उसने पैसे घेऊन शेतात बोअर पाडला. मात्र हा बोअरही फेल गेला. यंदा निसर्गानेही दगा दिला. त्यामुळे हातउसने घेतलेले पैसे व वडिलांच्या नावावर असलेले सोसायटीचे १५ हजारांचे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेत प्रभाकर भारती होते. त्यांना दोन मुले. मुलगी सातवीला तर मुलगा दहावीला. त्यांच्या शिक्षणाचाही खर्च भागवायचा कसा? वृद्ध आई-वडिलांची जबाबदारीही त्यांच्यावरच. अशा परिस्थितीत निसर्गाने दगा दिला. त्यामुळे शेतात काही पिकलं नाही. या गरिबीला कंटाळून प्रभाकर भारती यांनी बुधवारी मध्यरात्री आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना सतावत असलेल्या सर्व प्रश्नांना ते येथेच सोडून गेले.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई शिवाजी सुरवसे म्हणाले, प्रभाकर हा कष्टाळू शेतकरी. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांपासून आमच्या परिसरात पाऊसच झाला नाही. त्यामुळे जमीन नापीक झाली. प्रभाकरच्या शेतातील तुरीचं पीकही वाळून गेलं. मुलांच्या शिक्षणाचा आणि शेतीसाठी काढलेल्या कर्जाचा बोजा त्याच्यावर होता. या संदर्भात तो कोणाशी बोलला नाही. त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. शासनाने या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बोअर घेऊन पाण्याची शेती करण्याचा प्रयत्न प्रभाकरचा होता. त्यामुळेच त्यांनी हातउसने पैसे घेऊन बोअर घेतला. परंतु, नियतीच्या मनात वेगळेच होते. पाणीही लागले नाही. याच विवंचनेत प्रभाकरने आपली जीवनयात्रा संपविली. (वार्ताहर)
बुधवारी मध्यरात्री लातूर ते लोदगा जाणाऱ्या रोडलगत असलेल्या आंब्याच्या झाडाला प्रभाकर भारती यांचा मृतदेह लटकत असलेल्या अवस्थेत ग्रामस्थांनी पाहिला. भारती कुटुंबियांना हे कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन टाहो फोडला. पत्नी, मोठा भाऊ, वृद्ध आई-वडील, मुलगी, मुलगा यांनी एकच हंबरडा फोडला. हलाखीच्या परिस्थितीतून जीवन जगणारे कुटुंब म्हणून प्रभाकर भारती यांच्या कुटुंबियांकडे गाव पाहत होते. प्रभाकरच्या आत्महत्येमुळे गावातील प्रत्येक नागरिक हळहळ व्यक्त करीत होते.

Web Title: Hook took the money from the Boar, but he also failed ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.