अजिंठा लेणीत मधमाश्यांनी पुन्हा एकदा चढविला पर्यटकांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:52 IST2025-03-27T11:51:29+5:302025-03-27T11:52:27+5:30
रुमाल, स्कार्फ झाकून पर्यटकांनी मधमाश्यांपासून स्वत:चा बचाव केला

अजिंठा लेणीत मधमाश्यांनी पुन्हा एकदा चढविला पर्यटकांवर हल्ला
छत्रपती संभाजीनगर : अजिंठा लेणीत पुन्हा एकदा मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. जवळपास १० ते १२ पर्यटकांना मधमाश्यांनी डंख मारला. गेल्या १५ दिवसांपासून वेरुळ आणि अजिंठा लेणीत पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. या दोन्ही जागतिक वारसा स्थळांच्या परिसरात जागोजागी मधमाश्यांचे पोळे आहे. हे पोळे हटविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मधमाश्यांकडून हल्ले सुरूच आहेत. अजिंठा लेणीतील ताज्या घटनेवेळी पर्यटकांनी रुमाल, स्कार्फ चेहऱ्यावर झाकून बचाव करण्याचा प्रयत्न केला. अशातही मधमाश्यांनी डंख मारला. लेणीत बसून अनेकांनी स्वत:च्या शरीरावरील मधमाश्यांचे काटे काढले.
पर्यटनाला न येण्याचा सूर
अजिंठा लेणीत मंगळवारी मी स्वत: होतो. या घटनेनंतर अनेकांना यापुढे येथे टूरसाठी आणणार नाही, अशी प्रतिक्रिया जसवंतसिंह यांनी दिली. मधमाश्यांच्या या स्थितीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, असे औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे (एटीडीएफ) अध्यक्ष जसवंतसिंग म्हणाले.