सरकार वाढवणार उच्च शिक्षणाचा दर्जा
By Admin | Updated: June 12, 2014 01:32 IST2014-06-12T01:13:55+5:302014-06-12T01:32:10+5:30
बापू सोळुंके , औरंगाबाद उच्च शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे, यासाठी आतापर्यंत विद्यापीठासोबतच शासनाच्या उच्च शिक्षण विभागानेही पुढाकार घेतला आहे.

सरकार वाढवणार उच्च शिक्षणाचा दर्जा
बापू सोळुंके , औरंगाबाद
उच्च शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे, यासाठी आतापर्यंत विद्यापीठासोबतच शासनाच्या उच्च शिक्षण विभागानेही पुढाकार घेतला आहे. त्यासाठी २१ कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, राज्यातील सर्व उच्च शिक्षण सहसंचालकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना अकॅडमिक आणि संशोधनात्मक उपक्रमासंबंधी मार्गदर्शन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उच्च शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याची सतत ओरड होत आहे. अनेक महाविद्यालयांत मूलभूत आणि भौतिक सुविधा उपलब्ध नसतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर होतो. अशा महाविद्यालयांतून पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरही विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही. घसरत असलेला उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने आता पुढाकार घेतला आहे. वरिष्ठ महाविद्यालयात पदवीपूर्व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.
प्रकल्प राबविणे, त्यांना याची कारणे शोधण्यासाठी राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने नुकतीच विभागीय शिक्षण सहसंचालक, विविध शासकीय महाविद्यालयांचे प्राचार्य यांची बैठक बोलावली होती. वरिष्ठ महाविद्यालयांना मान्यता देण्यापुरतीच शिक्षण सहसंचालक कार्यालयाची भूमिका होती. विनाअनुदानित महाविद्यालयांचा तर या विभागाशी संपर्कही येत नव्हता. विद्यापीठाकडूनच महाविद्यालयांना संलग्नता घ्यावी लागते. तसेच महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसारच चालते. तेथील विविध अभ्यासक्रम, परीक्षा, निकालही विद्यापीठाच्याच हातात असतो. प्राध्यापकांची मान्यता, महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन आदीबाबत मार्गदर्शन करीत असते.
शैक्षणिक उपक्रम पडताहेत बंद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात चार जिल्हे आणि ३९२ महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांकडे लक्ष देणे विद्यापीठाला शक्य होत नसल्यामुळे विविध महाविद्यालयांतील शैक्षणिक उपक्रम बंद पडत आहेत.
महाविद्यालयात नेट-सेट तयारी वर्ग सुरू करावेत
केवळ महाविद्यालयाचा निकालाचा टक्का वाढला असला तरी त्याचा फारसा उपयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात होत नाही. त्यामुळे पदवीचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना संशोधनाचे धडे मिळाले पाहिजेत. महाविद्यालयांत संशोधन प्रकल्पांची संख्या वाढविण्यात यावी, तेथील जास्तीत जास्त विद्यार्थी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण झाले पाहिजेत, यासाठी महाविद्यालयात नेट-सेट तयारी वर्ग सुरू करावेत.
प्री-आयएएस कोचिंग सेंटर सुरू क रावे
केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जास्त विद्यार्थी यशस्वी झाले पाहिजेत यासाठी प्रत्येक महाविद्यालयात प्री-आयएएस कोचिंग सेंटर सुरू क रावे तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध करावी आदी २१ कलमांचा यात समावेश आहे.