छत्रपती संभाजीनगर : एकीकडे अरुंद रस्त्यावर सुसाट कारच्या धडकेत आई-वडिलांनी एकुलता एक मुलगा गमावला तर दुसऱ्या घटनेत तरुणाचा गतिरोधकावरून दुचाकी उडून थेट पोलिसांच्या वाहनाच्या चाकाखाली सापडून करुण अंत झाला. सोमवारी दोन कुटुंबांनी घरातले तरुण गमावल्याच्या या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. ओम अजय महाजन (२१, रा. नारेगाव) व विष्णू काशीनाथ खर्जुले (२६, रा. करमाड) अशी मृत युवकांची नावे आहेत.
ओम आई-वडिलांसह नारेगावमध्ये राहत होता. त्याचे वडील खासगी नोकरी करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही ओमने अभ्यास करून अभियांत्रिकीला प्रवेश मिळवला होता. तो तृतीय वर्षात होता. रविवारी रात्री ९ वाजता तो क्लासवरून दुचाकीने घरी परतत असताना नारेगावच्या जय भवानी चौकात त्याला सुसाट कारने (एमएच २० -जीआर -७९०१) उडवून पोबारा केला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
गतिरोधकावरून उडाला, पोलिस वाहनाने चिरडलेसोमवारी रात्री ८ वाजता विमानतळ परिसरात विष्णू खर्जुले (२६) या तरुणाचा वाहनाखाली मृत्यू झाला. विष्णू करमाडच्या दिशेने निघाला होता. याच वेळी एमआयडीसी सिडको पोलिस चिकलठाण्यातील दोन शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात पंचनामा करण्यासाठी शासकीय वाहनातून (एमएच २० -एचबी-९३२१) निघाले हाेते. विमानतळाच्या विरुद्ध दिशेच्या न्यू हायस्कूलसमोरील उंच गतिरोधकावरून विष्णूचा दुचाकीवरील तोल सुटून तो कोसळला. त्याच वेळी मागून जाणाऱ्या पोलिसांच्या सुसाट वाहनाखाली चिरडला गेला.
महिनाभरात पती, मुलाला गमावलेदोन विवाहित बहिणी असलेला विष्णू लहान भाऊ व आईसह करमाडला राहत होता. महिनाभरापूर्वीच आजारपणामुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. महिनाभरात पतीसह मोठा मुलगाही गमवावा लागल्याने त्याच्या आईचा आक्रोश प्रत्येकाचे मन हेलावून गेला.
पोलिसांची याच घटनेत इतकी तत्परता का ?-पोलिसांच्या दाव्यानुसार, गतिरोधकावरून उडून दुसऱ्या दुचाकीच्या हँडलचा धक्का लागून विष्णू पोलिसांच्या वाहनाला धडकला. प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार, गतिराेधकावरून उडाल्यानंतर विष्णू रस्त्यावर कोसळला. त्यानंतर पोलिसांचे वाहन त्याच्या अंगावरून गेले.-सामान्यत: अपघाती मृत्यू प्रकरणात पोलिस कुटुंबाची फिर्याद घेतात. सहसा शवविच्छेदनाच्या अहवालानंतर गुन्हा दाखल होतो. मात्र, विष्णूच्या मृत्यू प्रकरणात ८ वाजेच्या अपघातात शवविच्छेदनाआधीच पोलिसांनी स्वत:च फिर्यादी होत १:४३ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करून टाकला. त्यामुळे नेमके दोषी कोण, हा प्रश्न जाणीवपूर्वक अनुत्तरित ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.