शेतकऱ्यांना मदतीचा हात
By Admin | Updated: June 13, 2016 00:47 IST2016-06-13T00:37:33+5:302016-06-13T00:47:30+5:30
औरंगाबाद : मागील तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाने आर्थिक व मानसिकरीत्या खचलेल्या शेतकऱ्यांना आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजींच्या अनमोल वाणीने

शेतकऱ्यांना मदतीचा हात
औरंगाबाद : मागील तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाने आर्थिक व मानसिकरीत्या खचलेल्या शेतकऱ्यांना आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजींच्या अनमोल वाणीने नवऊर्जा मिळाली, सकल जैन समाजाने मदतीचा हात पुढे करून त्यांना मोफत बियाणे व खत दिले... यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नवतेज, नवी आशा निर्माण झाली होती. नव्या उमेदीने पुन्हा शेतीच्या कामाला लागू आणि शेतीला सुजलाम, सुफलाम करू, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
आनंदजी कल्याणजी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती आणि सकल जैन समाजाच्या वतीने गुरु राम जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अभय महोत्सव’ शहरात सुरू आहे. रविवारी सकाळी पानदरिबा येथील अग्रसेन भवन येथे आयोजित ‘माणुसकी’च्या सोहळ्यात शेतकरी सहकुटुंब सहभागी झाले होते. यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रशांत देसरडा यांच्यासह सकल जैन समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे, खत देण्यात आले.
राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या भरवशावर देशाची अर्थव्यवस्था चालते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे. जैन समाज नेहमी मदतीसाठी अग्रेसर असतो, असेही त्यांनी नमूद केले.
आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज यांनी शेतकऱ्यांना आशीर्वाद दिला. यंदा पाऊस चांगला पडेल, भरघोस पीक येईल. देव उशिरा देतो, पण अन्याय करीत नाही, असे महाराज म्हणताच शेतकऱ्यांचा चेहरा आनंदाने खुलून गेला. पंन्यास योगरत्न मुनीजी म्हणाले की, मानव प्रेमापासूनच जैन धर्माची सुरुवात होते. सकल जैन समाज नेहमी मदतीसाठी पुढे असतो, आजही शेतकऱ्यांना योग्य वेळी बियाणे-खत वाटप करून जैन समाजाने ‘माणुसकीचे दर्शन’ घडविले. यानंतर शेतकऱ्यांनी आचार्यश्रींचे रांगेत दर्शन घेतले. प्रास्ताविक महावीर पाटणी यांनी तर संचालन संजय संचेती यांनी केले.
यावेळी चांदमल सुराणा, ललित पाटणी, रतिलाल मुगदिया, मदनलाल अच्छा, विनोद बोकाडिया, मिठालाल कांकरिया, रवी मुगदिया, विलास साहुजी, पीयूष कासलीवाल, नरेंद्र अजमेरा आदी पदाधिकारी व समाजबांधव हजर होते.