मानवी साखळी उत्साहात
By Admin | Updated: August 6, 2014 02:35 IST2014-08-06T02:26:56+5:302014-08-06T02:35:18+5:30
औरंगाबाद : येथील एडीसीएच्या मैदानावर मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.

मानवी साखळी उत्साहात
औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटचे (आयआयएम) केंद्र औरंगाबादेत व्हावे यासाठी चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरने (सीएमआयए) पुढाकार घेतला असून, आज दुपारी सिडको एन-२ येथील एडीसीएच्या मैदानावर मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. भरपावसातही अभियांत्रिकी आणि मॅनेजमेंटच्या शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हजेरी लावली.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते मानवी साखळीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ‘आयआयएम’सारखी संस्था ऐतिहासिक औरंगाबाद शहरात यावी म्हणून आपण वैयक्तिकरीत्याही प्रयत्न करीत आहोत. शासनाने हे केंद्र औरंगाबादला द्यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असतानाही एडीसीएच्या मैदानावर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
पावसात भिजत तरुणाईने जोरजोरात घोषणा दिल्या. ‘आयआयएम औरंगाबाद’ या घोषणेने मैदान दणाणून सोडण्यात आले होते. हातात झेंडे घेऊन तरुण-तरुणी डोलत होते. एडीसीएच्या मैदानावर देशभक्तीवर आधारित गाणीही वाजविण्यात येत होती. शेवटी राष्ट्रगीताने मानवी साखळीचा समारोप करण्यात आला.
मानवी साखळीच्या उपक्रमाला औद्योगिक व इतर १४ संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता.
यावेळी सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा, माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, मासीआचे अध्यक्ष भारत मोतिंगे, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ एच.एम. देसरडा, प्रशांत देशपांडे, मिलिंद कंक, रितेश मित्रा, डॉ. गौतम शहा, क्रेडाईचे बाळकृष्ण भाकरे, राठी, अॅड. वसंत देशमुख यांच्यासह काही ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते.