कामगारांना ३ हजारांची मदत

By Admin | Updated: June 9, 2014 00:10 IST2014-06-08T23:25:11+5:302014-06-09T00:10:27+5:30

जालना : इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध वस्तूऐवजी रोख ३ हजार रूपये रक्कम दिली जाणार आहे.

Help of 3,000 workers | कामगारांना ३ हजारांची मदत

कामगारांना ३ हजारांची मदत

जालना : इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध वस्तूऐवजी रोख ३ हजार रूपये रक्कम दिली जाणार आहे. त्यासाठी कामगार विभागाकडून जिल्ह्यातील कामगारांसाठी १ कोटी ४७ लाख ९३ हजार रुपयांची तरतूद केली आहे. याचा फायदा जिल्ह्यातील ४ हजार ९३१ कामगारांना होणार आहे.
कामगारांना मच्छरदाणी, ब्लँकेट, चादर, जेवणाचा डबा, चटई अशा अनेक वस्तू खरेदीसाठी ही रक्कम दिली जाणार आहे. मात्र जिल्ह्यात जनजागृतीच्या अभावामुळे हजारो कामगार या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कामगारांची संख्या ४ हजारांपेक्षा अधिक असली तरी बऱ्याच कामगारांनी आपल्या कार्डचे नूतनीकरण केलेच नाही. जिल्ह्यात जालना, भोकरदन, बदनापूर, परतूर मंठा, अंबड, जाफराबाद घनसांवगी अशा आठ तालुक्यांसह शहरातील बांधकाम कामगारांची संख्या ४ हजार ९३१ एवढी आहे. परंतु नोंंदणीकृत कामगाराची संख्या फक्त २ हजार ९३१ आहे. कामगारांनी ताबडतोब कामगार मंडळ कार्यालयात येऊन आपल्या कार्डचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन कामगार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये धनादेशाद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे. कामगार आयुक्त कार्यालयामार्फत अर्थसाह्य वाटप केले जाणार आहे. त्यासाठी झिरो बॅलेन्सवर खाते उघडण्यासाठी कामगारांना सूचना केल्या आहेत. तसे पत्र बँकांना दिले असल्याची माहिती कामगार अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, कामगार नेते अण्णा सावंत म्हणाले की, कामगारांसाठी घर बांधणीस दीड ते दोन लाखांची मदत देणे, मुलांना लॅपटॉप, दिवाळीला बोनस अशा अनेक योजना आल्या. परंतु त्याचा फायदा कामगारांना झाला नाही. जोपर्यंत कामगारांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत या योजनेचे काय होईल सांगता येत नाही. सर्वच योजनांसंदर्भात कामगारांमध्ये व्यापक जनजागृतीची गरज आहे. (प्रतिनिधी)
२ हजारावर बांधकाम कामगार
शहरात अनेक ठिकाणी बांधकाम प्रकल्प सुरू असल्याने तेथे कामगारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या ४ हजार ९३१ आहे. मात्र त्यामधील २ हजार १०२ बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी केली आहे.
कामगारांच्या नोंदणी संख्येच्या क्रमवारीत औरंगाबाद नंतर या जिल्ह्याचा क्रमांक लागतो. परंतु नोंदणी न केल्याने हजारो कामगार या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शहरातील अलंकार लेबर नाका, शिवाजी पुतळा, मुजाहिद्दीन चौक, नूतन वसाहत उड्डाणपुलाजवळ, रेल्वेस्टेशन अशा भागात इमारत व इतर बांधकाम कामगार दररोज काम मिळेल, या आशेने थांबलेले असतात.

Web Title: Help of 3,000 workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.