लोहटा, कोथळा परिसरात गारपीट
By Admin | Updated: April 13, 2015 00:47 IST2015-04-13T00:42:49+5:302015-04-13T00:47:06+5:30
उस्मानाबाद / कळंब : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने एकच धुमाकूळ घातला आहे़ वादळी वारे, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले़

लोहटा, कोथळा परिसरात गारपीट
उस्मानाबाद / कळंब : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने एकच धुमाकूळ घातला आहे़ वादळी वारे, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले़ तर उस्मानाबाद व कळंब शहर व परिसरात रविवारीही अवकाळी पाऊस झाला़ कळंब तालुक्यातील लोहटा पूर्वसह परिसरात काही काळ गारपीट झाली़
कळंब शहरात परिसरात रविवारी दुपारी अवकाळी पाऊस झाला़ तर तालुक्यातील लोहाट पूर्व, कोथळा, डिकसळ शिवार, पिंपळगाव (डो़) आदी परिसरात काही काळ गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ या गारांच्या तडाख्यात पिंपळगाव डोळा येथील बाळासाहेब पाटील यांच्या दीड एकरातील टोमॅटो, तीन एकर टरबूज, एक एकर आंबा, तीन एकर लिंबासह दाळींब बागेचे नुकसान झाले़ अमृत टेकाळे, सुभाष पाटील यांच्या फळबागांचेही नुकसान झाले़ याशिवाय इटकूर येथील जयदेव एकशिंगे, अच्यूत अडसूळ, नवनाथ आडसूळ याच्या टोमॅटो व कांदा पिकाचे नुकसान झाले़ वाकडीचे विलास कुरूंद, पांडुरंग कोल्हे, हनुमंत कोल्हे यांच्या १५ एकरावरील टरबुजाशिवाय पपईचेही नुकसान झाले़ आथर्डी, हासेगाव, केज येथील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शनिवारी रात्री झालेल्या आंदोरा येथील सतीश तांबारे यांच्या कांदे व दोडका, भिमराव गाढे यांच्या शेतातील कांदा पिकाचे नुकसान झाले़ तर लोहटा पूर्व परिसरातील शेतकऱ्यांचा कांदाही या अवकाळी पावसामुळे झोपला आहे़ उस्मानाबाद शहरासह परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला़ पावसामुळे पिकांचे नुकसान झाले़ (प्रतिनिधी)