विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्र्यांच्या गाड्या अडवा
By Admin | Updated: April 27, 2016 00:35 IST2016-04-27T00:09:28+5:302016-04-27T00:35:34+5:30
औरंगाबाद : देशात केवळ जाती, धर्माचे राजकारण सुरू आहे. विद्यार्थ्यांवर विशिष्ट विचारप्रणाली लादण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्र्यांच्या गाड्या अडवा
औरंगाबाद : देशात केवळ जाती, धर्माचे राजकारण सुरू आहे. विद्यार्थ्यांवर विशिष्ट विचारप्रणाली लादण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही. आक्रमक बना, मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघतो आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना फी माफी मिळत नसेल तर मंत्र्यांना फिरू देऊ नका, त्यांच्या गाड्या अडवा, असा सल्ला काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आज नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडिया (एनएसयूआय) च्या मेळाव्यात विद्यार्थ्यांना दिला.
शहरातील भानुदासराव चव्हाण सभागृहात आज एनएसयूआयचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेवराव पवार, जितेंद्र देहाडे यांच्यासह प्रभाकर मुठ्ठे, सरोज मसलगे, सतीश पितळे, सूरज निकम, सागर साळुंके आदींची उपस्थिती होती. राणे म्हणाले, देशात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात विद्यार्थी भरडला जातो आहे. हे सर्व होत असताना देशपातळीवर केवळ दोनच विद्यार्थी संघटना दिसतात. एकीकडे भाजपची एबीव्हीपी आणि दुसरीकडे डाव्या पक्षांची विद्यार्थी संघटना. काँग्रेसची विद्यार्थी आघाडी (एनएसयूआय) यात कुठेही दिसत नाही. ही खेदाची बाब आहे. तुमची भूमिका कन्हैया वठवीत आहे. तुमच्याऐवजी तो मोदींना ठोकतो आहे. आता गप्प बसणे सोडा. वयाप्रमाणे आक्रमकता दाखवा आणि अधिक आक्रमक व्हा. आज मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. परंतु इथल्या विद्यार्थ्यांना फी माफीही मिळत नाही ही गंभीर बाब आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आक्रमक होऊन मंत्र्यांच्या गाड्या अडविल्या पाहिजे, असेही राणे म्हणाले. तत्पूर्वी नामदेवराव पवार यांनीही आपल्या भाषणात केंद्र आणि राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजपचे सरकार कुणासाठी काम करतेय हे कळत नाही. प्रास्ताविक सागर साळुंके यांनी केले.
अणेंना सोडणार नाही
राणे यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या श्रीहरी अणेंवरही टीका केली. ते म्हणाले, अणेच्या कानफाटात मारा किंवा किमान शाई तरी फेका, असा निरोप देऊन मी माझे कार्यकर्ते दिल्लीत पाठविले होते. तेथे त्यांनी अणेंच्या अंगावर शाई फेकली.
बाकी काही करता आले नाही. आता फिरतोय महाराष्ट्रभर, पण कधी ना कधी माझ्या टप्प्यात येईल तेव्हा सोडणार नाही, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.