शासनाच्या दुट्टपी धोरणाचा फळबागांना बसणार फटका
By Admin | Updated: March 5, 2015 00:00 IST2015-03-04T23:49:10+5:302015-03-05T00:00:48+5:30
घनसावंगी : तालुक्यात ४ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. मात्र कृषि विभागाने पुनरूज्जीवनासाठी फक्त १७५ हेक्टर क्षेत्राचाच लक्षांक दाखविला आहे

शासनाच्या दुट्टपी धोरणाचा फळबागांना बसणार फटका
घनसावंगी : तालुक्यात ४ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. मात्र कृषि विभागाने पुनरूज्जीवनासाठी फक्त १७५ हेक्टर क्षेत्राचाच लक्षांक दाखविला आहे. त्यामुळे तालुक्यातील ३ हजार हेक्टरवरील बागायतदार शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याने त्यांच्या बांगाचे पुनरूज्जीवन धोक्यात येणार आहे.
घनसावंगी तालुक्यातील ११७ गावांतील १७५ हेक्टरवरील शेतकऱ्यांनाच मदत देण्याचे कृषि विभागाने ठरविले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ३ हजार हेक्टरवरील बागायतदार शेतकऱ्यांना फळबागा पुनरूज्जीवनाचा फायदा होणार नाही. त्यामुळे त्यांच्या बागा धोक्यात आलेल्या आहे. दुष्काळामुळे खरीप व रबीचे पीक हातचे गेलेले असतानाच फळबागा वाचवायच्या कशा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
तालुक्याला १७५ हेक्टरचा लक्षांक दिल्याने यामध्ये बहुवार्षिक फळबागा वाचविण्यासाठी लाभार्थींना मदत देताना मापदंड निश्चित केलेले आहे.
यामध्ये फळबाग लाभार्थी निवड करताना शेतकऱ्यांच्या ७/१२ व ८-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. या योजनेचा कालावधी ३१ मार्च २०१५ पर्यंत आहे.
यामध्ये फळबागांचे पुनरुज्जीवन, पुर्नसंभार व्यवस्थापनसाठी प्रति हेक्टर ४० हजार प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के, जास्तीत जास्त २० हजार रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे प्रती लाभार्थी २ हेक्टरपर्यंत, प्लॅस्टिक अच्छादनसाठी प्रति हेक्टरी ३२ हजार, प्रत्यक्ष खर्चाच्या ५०टक्के, जास्तीत जास्त १६ हजार रुपये प्रति लाभार्थी २ हेक्टरपर्यंत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थापन प्रति हेक्टर ४ हजार रुपये खर्चाच्या ३० टक्के जास्तीत जास्त १२०० रुपये प्रति हेक्टर प्रति लाभार्थी ४ हेक्टरच्या मर्यादेत असे मदतीचे स्वरुप आहे. पण तालुक्यात कमी लक्षांत दिल्याने उर्वरित शेतकऱ्यापूढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. कृषी विभागान मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
शासनाने फळबागाचे मोठे क्षेत्र असताना अत्यल्प क्षेत्राची निवड करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे अनेक फळबाग उत्पादक शेतकरी वंचित राहणार आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन जाब विचारावा. या विरूद्ध मोर्चा काढू
- कल्याण सपाटे
शासन हे व्यापाऱ्यांच्या हिताचे व शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. शेतकऱ्यांना अनुदान देतांना मोठा अन्याय शेतकऱ्यांवर केला.
- पंडीत धांडगे
४दुष्काळी परिस्थिती मुळे आधीच शेतकरी आर्थीक अडचणीत असताना त्यांच्यावर अन्याय केला आहे. याविरूद्ध उपोषणास बसणार
- बाळासाहेब बोरकर
४दरम्यान सर्व शेतकऱ्यांना समान अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी बाळे पांढरे, रामेश्वर वाढेकर, विष्णू कोरडे, प्रकाश पसारे यांनी केली.