वाळू तस्करांना राजकीय अभय
By Admin | Updated: May 28, 2014 00:25 IST2014-05-27T23:55:17+5:302014-05-28T00:25:33+5:30
रवि गात , अंबड अंबड तालुक्यास मोठा गोदाकाठ लाभलेला आहे. मागील काही काळापासून गोदापात्रातून करण्यात येणार्या वाळू तस्करीने तालुक्यात समांतर काळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे.

वाळू तस्करांना राजकीय अभय
रवि गात , अंबड अंबड तालुक्यास मोठा गोदाकाठ लाभलेला आहे. मागील काही काळापासून गोदापात्रातून करण्यात येणार्या वाळू तस्करीने तालुक्यात समांतर काळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. या वाळू तस्करांना राजकीय अभय मिळत असल्याने तस्करांचे काहीही वाकडे होत नाही या आविर्भावात तस्करी सुरु आहे. अर्थ व्यवस्थेतही मोठी उलटापालट केली आहे. वाळू तस्करांकडे काही काळापूर्वी एक ट्रक होता त्यांची आज मोठ्या संख्येने अत्याधुनिक ट्रकव्दारे वाळू तस्करी सुरु असल्याचे पाहावयास मिळते. संपूर्ण गोदाकाठात सध्या वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. गोदापात्राची पाहणी केली असता गोदापात्र वाळू माफियांनी चाळणी केल्याचे दिसते. जेसीबी, पोकलेन, यांत्रिक बोट आदी यंत्रांच्या सहाय्याने वाळू माफियांनी गोदापात्राचे विद्रुपीकरण केल्याचे पाहावयास मिळते. गोदापात्रात अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे आहेत. काही ठिकाणी तर पूल बांधण्यात आले आहे. ठिकाणी कोठेही वाळू न दिसता आपल्याला आता केवळ माती मिळते. काही महिन्यांपूर्वी याच गोदापात्रात रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करणार्या पोकलँडने मजुराच्या चिमुरड्याचा बळी घेतला. यावेळी अन्य एक बालक गंभीर जखमी झाले होते. घटना घडल्यानंतर मोठा गहजब उडाला. कारवाई मात्र शून्य. एवढया मोठया घटनेनंतरही वाळू तस्करी अद्यापही तशीच बिनदिक्कतपणे सुरु आहे. तालुक्यात रात्रीच्या वेळी सर्रास वाळू तस्करी सुरु आहे. या वाळू तस्करीच्या मार्गाबाबत सामान्य जनतेमध्ये चर्चा आहे. महसूल विभागाचीही कारवाई कमी पडत आहे. वाळू तस्करांवर किरकोळ कारवाईनंतर काही दिवसांतच कारवाईनंतर वेगाने वाळू तस्कारी होत असल्याचे दिसून येते. महसूल विभाग कारवाईस कमी पडतो की, काय अशी चर्चा आहे. अंबड शहरात रात्री नऊ वाजेनंतर वाळु तस्करी करणारी रिकामी वाहने गोंदी, शहागडे जाताना दिसतात. या वाहनांची संख्या मोठी आहे. तसेच मध्यरात्रीनंतर हीच वाहने वाळू भरुन जालना, औंरगाबाद शहराकडे जाताना दिसतात. शहरातून जाणारी ही वाहने सामान्य नागरिकांना दिसतात. यातून अनेकदा मोठे तसेच किरकोळ अपघातही होतात. अंबड व घनसावंगी तालुक्यात विस्तीर्ण नदीपात्रे आहेत. यातून दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. अवैध उपसा करणार्यांवर महसूल विभागाने कायमस्वरुपी कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींतून होत आहे. नदीपात्राचा पर्यावरणदृष्ट्या ºहास होत आहे.