जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामात गोलमाल

By Admin | Updated: May 22, 2014 00:11 IST2014-05-21T23:33:03+5:302014-05-22T00:11:34+5:30

दिनेश गुळवे , बीड जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तब्बल दीड हजार कामे सुरू आहेत. या कामांवर तीस हजार मजूर कार्यरत आहेत.

Golmaal in the work of employment guarantee in the district | जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामात गोलमाल

जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामात गोलमाल

दिनेश गुळवे , बीड जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तब्बल दीड हजार कामे सुरू आहेत. या कामांवर तीस हजार मजूर कार्यरत आहेत. असे कागदोपत्री दिसून येत असले तरी प्रत्यक्षात अनेक कामे मजुरांऐवजी यंत्राणेच होत आहे. असा ‘गोलमाल’ सर्रास सुरू असल्याने योजनेच्या उद्देशालाच जिल्ह्यात हरताळ फासला जात आहे. ग्रामीण भागात मजुरांना काम मिळत नसल्याने उपासमार, गरिबी असे अनेक प्रश्न उद्भवतात. मजुरांना शेतीच्या हंगामात कामे असतात. तर, उन्हाळा, दुष्काळ अशावेळी मजुरांना रोजगार मिळत नाही. मजुरांना ग्रामीण भागात रोजगार मिळावा, त्यांचा आर्थिक स्तर उंचावला जावा आदी उद्देशाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना मात्र सध्या जिल्ह्यात राबविण्यासाठी अनेक ठिकाणी ‘साखळी’ कार्यरत असल्याचा आरोप अशोक डोईफोडे यांनी केला आहे. तसेच या योजनेत काही ‘दलाल’ही असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्राम रोजगार सेवक, ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती ते थेट जिल्हास्तरावरील कार्यालय अशी साखळी असल्याचेही काही ठिकाणी दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्या तहसील व ग्रामपंचायत यांच्या मार्फत रोहयोची कामे सुरू आहेत. यामध्ये १ हजार ४२१ कामे सध्या सुरू असून या कामांवर २९ हजार ४५० कामे सुरू आहेत. अंबाजोगाई १२६, आष्टी १४०, बीड ३१५, धारूर ४, केज ५९, माजलगाव ०, परळी ९, पाटोदा १५२, शिरूर २८८ जर वडवणी तालुक्यात ३० कामे सध्या सुरू आहेत. रोहयो अंतर्गत सिंचनासाठी विहीर, रस्ते, कृषी, वनीकरण, सामाजिक वनीकरण या अंतर्गत विविध कामे सुरू आहेत. विहिरींची ७८१, रस्त्यांची १९६, कृषीची ६२८, वनीकरण २२५ याप्रमाणे कामे सुरू आहेत. वनीकरण अंतर्गत रोपवाटीका, वृक्ष लागवड संवर्धनाची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. यातील अनेक कामे यंत्राच्या सहाय्याने सुरू आहेत. रोहयोच्या कामाचे सूत्र असे आहे की, ६० टक्के कामे मजुरांकडून करण्यात यावीत तर ४० टक्के कामे यंत्राच्या सहाय्याने करता येतात. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे जेसीबीसह इतर यंत्राच्या सहाय्याने सुरू आहेत. अपवादात्मक स्थितीतच मजूर दिसून येत आहेत. विशेष म्हणजे अनेक रस्ते रातोरातच केल्याचे दिसून येत असल्याचा आरोप संतोष जाधव यांनी केला आहे. वनीकरण अंतर्गत सुरू असलेल्या कामाचीही हीच गत आहे. अनेक ठिकाणची कामे केवळ कागदोपत्रीच दाखविण्यात येत असल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची व कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश धांडे यांनी केली आहे. रोहयोची कामे सुरू असल्याचा व कामांवर मजूर असल्याचा अहवाल ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक हे पाठवितात. यावर ‘अर्थपूर्ण’ व्यवहार होऊन पुढील सर्व सोपस्कर पूर्ण केले जात असल्याचाही आरोप धांडे यांनी केला. सदर कामावर सरपंच, संबंधित नातेवाईक यांचीच हजेरी अनेक ठिकाणी दाखविण्यात येते. प्रत्यक्षात हे मजूर कामावरच नसतात, मात्र जेव्हा पैसे येतात, तेव्हा त्यांच्या बॅँक किंंवा पोस्ट खात्यावरून हे पैसे काढले जातात. नंतर हे पैसे त्यांच्याकडून सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक किंवा ‘दलाल’ परत घेऊन आपली तुंबडी भरीत असल्याचे जयदीप सवई यांनी सांगितले. एंकंदरच सध्या जिल्ह्यात मग्रारोहयो मध्ये ‘गोलमाल’ सुरू असून या अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्याची शरद चव्हाण, पिंटू माने, अशोक रोमन आदींनी केली आहे. अडीच लाखांना जॉबकार्ड, तीस हजारांना काम जिल्ह्यात यावर्षी तब्बल अडीच लाख मजुरांनी कामाची मागणी केली होती. यावरून २ लाख ४३ हजार ६०२ जणांना जॉबकाडॅ देण्यात आले. असे असले तरी अनेक मजुरांना अद्यापही काम मिळालेले नाही. सध्या केवळ ३० हजार मजूर कामावर आहेत. यामुळे मजुरांमधून रोजगारासाठी कामांची संख्याही वाढविण्याची मागणी होत आहे. कामाच्या ठिकाणी सुविधांचा अभाव ज्या ठिकाणी रोहयोअंतर्गत कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी महिला मजुरांच्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी महिल असणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही सोय करणे तसेच एखाद्या मजुरास इजा झाल्यास प्रथमोपचर करता यावेत यासाठी प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी याचा अभाव असल्याचे दिसून येते. कामे यंत्राने, नंतर मस्टरवर नोंद मग्रारोहयो अंतर्गत होणारी अनेक कामे यंत्राच्या सहाय्याने होत आहेत. काही कामे तर चक्क रातोरात झाल्याचे सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास येत आहेत. कामे यंत्राणे झाल्यानंतर मस्टरवर मजुरांची नोंद करून ‘काम फत्ते’ केले जाते. अशा प्रकारावर कारवाईची अपेक्षाही नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. चौकशीसाठी नेमणार ‘टीम’ रोहयोच्या कामे यंत्राच्या सहाय्याने करून नंतर मजुरांची नावे नोंदवून ‘गोलमाल’ केला जात असल्या संदर्भात रोहयो उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख म्हणाले की, कामे कशी होतात याची गटविकास अधिकारी यांनी पाहाणी करावयस हवी. तसेच मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी ‘टीम’ नेमणार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Golmaal in the work of employment guarantee in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.