हरभरा खरेदीच्या गैरव्यवहाराची चौकशी
By Admin | Updated: August 9, 2014 00:37 IST2014-08-08T23:41:45+5:302014-08-09T00:37:58+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या हरभरा खरेदी केंद्रावर गैरव्यवहार झाल्याची तक्रार शेतकरी संघटनेने

हरभरा खरेदीच्या गैरव्यवहाराची चौकशी
लातूर : लातूर जिल्ह्यात हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या हरभरा खरेदी केंद्रावर गैरव्यवहार झाल्याची तक्रार शेतकरी संघटनेने पणन संचालकांकडे केली होती. या तक्रारीनुसार औसा व लातूर येथील हरभरा खरेदीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश पणन संचालकांनी ५ आॅगस्ट रोजी दिले आहेत. जिल्हा उपनिबंधकांनी लातूर व औसा खरेदी केंद्राला पत्र काढले आहे.
२०१३-१४ च्या रबी हंगामातील हरभऱ्याला केंद्र सरकारने ३ हजार १०० रुपये हमीभाव जाहीर केला होता. त्यानुसार देशपातळीवर नाफेड या संस्थेकडे खरेदीची जबाबदारी देण्यात आली होती. नाफेडने महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन या संस्थेमार्फत राज्यात हरभऱ्याची खरेदी केली.
लातूर, औसा, उदगीर व अहमदपूर या चार केंद्रांवर १७ फेब्रुवारी ते २४ मे या कालावधीत ८१ हजार ७८४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला होता. त्यापैकी ४० हजार ४७५ क्विंटलची खरेदी एकट्या लातूर केंद्रावर झाली होती. त्यानंतर औसा केंद्रावर २४ हजार ४१ क्विंटल खरेदी झाली. या दोनच केंद्रांवर ७० टक्के हरभऱ्याची खरेदी झाली होती. एकूण खरेदीपैकी ३० टक्के खरेदी दोन महिन्यांत झाली तर ७० टक्के खरेदी एकाच महिन्यात झाल्याने यात गैरव्यवहार झाल्याचा संशय घेत शेतकरी संघटनेने तक्रार केली होती.
लातूर व औसा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडूनच हरभऱ्याची खरेदी नाफेडचे अधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी मिळून एफएक्यूच्या नावाखाली शेतकऱ्यांना हरभरा नियमात बसत नसल्याचे कारण पुढे करीत माघारी लावले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव बाजार समितीमध्ये अत्यंत कमी किंमतीत हरभरा विकावा लागला.
मात्र तोच हरभरा व्यापाऱ्यांकडून हमीभाव खरेदी केंद्रांवर विकला गेला. पेरा नसताना तलाठ्याकडून चुकीचा पेरा लावून अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून माल खरेदी केल्याचा संशय वाढल्याने पणन संचालकांनी या दोन खरेदी केंद्रांचे चौकशीचे आदेश बजावले आहेत. जिल्हा उपनिबंधक औसा व लातूरच्या खरेदी केंद्राची चौकशी करणार आहेत. त्यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एम.जी. गुंजकर व औसा येथील सहाय्यक निबंधकांना पत्र दिले आहे.
याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केली आहे़
राज्याचे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी हमीभावाने खरेदी केलेल्या औसा व लातूर येथील हरभरा खरेदी केंद्राची चौकशी करावी. या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून, हा माल व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आल्याची तक्रार असल्याने तात्काळ संबंधित खरेदी केंद्रांवर झालेल्या हरभरा पिकाच्या खरेदीबाबत सविस्तर चौकशी करून त्याचा चौकशी अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करावा, असे पत्र विभागीय सहनिबंधक व्ही.एस. साहोत्रे यांना दिले आहेत.