जिल्ह्यात २३ लाख लाभार्थ्यांना मोफत धान्य देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:05 IST2021-07-09T04:05:51+5:302021-07-09T04:05:51+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे आर्थिक संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे गरिबांना आधार देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जुलै ...

जिल्ह्यात २३ लाख लाभार्थ्यांना मोफत धान्य देणार
औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे आर्थिक संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे गरिबांना आधार देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना पाच किलो धान्य मोफत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कळविले आहे.
अंत्योदय योजनेअंतर्गत ३ लाख २१ हजार ८२१ लाभार्थ्यांना ९६५ मेट्रिक टन गहू तर ६४४ मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंबातील २० लाख ८ हजार ५३० लाभार्थ्यांना ६ हजार २६ मेट्रिक टन गहू तर ४०१७ मेट्रिक टन तांदूळ देण्यात येणार आहे.
प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना प्रतिमाह पाच किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी रास्त भाव दुकानातून नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त प्रतिसदस्य मोफत अन्नधान्य देण्यात येईल. एक देश एक रेशनकार्ड योजनेंतर्गत कोणत्याही लाभार्थ्यांना कोणत्याही राज्यातील अथवा जिल्ह्यातील रास्तभाव दुकानातून धान्य घेता येणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांंनी मोफत धान्य घ्यावे, असे प्रशासनाने कळविले आहे.