हेल्थ केअरच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:05 IST2021-09-23T04:05:06+5:302021-09-23T04:05:06+5:30

औरंगाबाद : प्रतिमहिना ३५० रुपयेप्रमाणे २० महिने ७ हजार रुपये गोळा करून शहरातील शेकडो नागरिकांना ३० लाख १३ हजार ...

Fraud of billions under the guise of health care | हेल्थ केअरच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

हेल्थ केअरच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

औरंगाबाद : प्रतिमहिना ३५० रुपयेप्रमाणे २० महिने ७ हजार रुपये गोळा करून शहरातील शेकडो नागरिकांना ३० लाख १३ हजार ८५ रुपयांची फसवूणक केल्याच्या प्रकरणात फेनॉलिनल हेल्थ केअर कंपनीचा प्रमुख नंदलाल केसरसिंग यास आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. हेल्थ केअरचा हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याची माहिती निरीक्षक दादाराव सिनगारे यांनी दिली. तसेच ज्यांनी तक्रार केलेली नाही, त्यांनी पुढे यावे, असे आवाहनही सिनगारे यांनी केले आहे.

अतुल बाळासाहेब जाधव (३५, रा. गट नं.५२/१, सारा व्यंकटेश बिल्डिंग सी १, विंग १, प्लॉट नंबर ९, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर) यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यात फेनॉलिनल हेल्थ केअर सर्व्हिसेस कंपनी लिमिटेडचे चेअरमन नंदलाल केसरसिंग, संचालक थक्केमधाथील श्रीधरन नायर, सेबेस्टिन मल्लीकल, मीनबहादूर केसरसिंग, कार्यकारी संचालक विलास बाळकृष्ण नायर आणि जोसेफ लाझर (सर्व रा. मुंबई) यांचा समावेश होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नंदलाल यास लातुर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेने त्याचा ताबा २१ सप्टेंबर रोजी लातुर कारागृहातून घेतला. ही कामगिरी निरीक्षक दादाराव सिनगारे, तपासी अधिकारी सहायक निरीक्षक तृप्ती तोटावार, सहायक फाैजदार गोकुळ वाघ, नाईक विठ्ठल मानकापे, संजय जारवाल, संदीप जाधव, अनिल थोरे, बाबा भानुसे यांच्या पथकाने केली. दरम्यान, आरोपीला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

चौकट,

काय आहे प्रकरण

फेनॉलिनल हेल्थ केअर कंपनीने दरमहा ३५० रुपयेप्रमाणे २० महिने ७ हजार रुपये जमा करून घेतले. या बदल्यात कंपनी नऊ वर्षांनी दुप्पट १४ हजार रुपये देणार होती. तसेच ९ वर्षांच्या कालावधीत दवाखान्याचा खर्च हा या पॉलिसीतंर्गत विनामूल्य होणार असल्याचे कंपनीच्या ज्योतीनगर येथील कार्यालयातील व्यवस्थापक विकास पाटील यांनी सांगितले. यानुसार अतुल जाधव यांनी १ जानेवारी २००५ ते २८ मे २०१८ या कालावधीत पैसे भरले. त्यानंतर ३० आॅक्टोबर २०१५ रोजी पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे मूळ पॉलिसी व पैसे भरणा पावत्या जमा करून कंपनीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातून जाधव यांच्या नावे १४ हजार रुपयांचा धनादेश आला. मात्र तो धनादेश वटलाच नाही. तेव्हा कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली असता बंद दिसले. याच प्रकारे शहरातील शेकडो जणांना कंपनीने ३० लाख १२ हजार ८५ रुपयांना फसविण्यात आले आहे.

Web Title: Fraud of billions under the guise of health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.