चार अट्टल घरफोडे पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: June 26, 2016 00:47 IST2016-06-26T00:21:40+5:302016-06-26T00:47:25+5:30
औरंगाबाद : शहर व परिसरात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखा आणि उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने अटक केली.

चार अट्टल घरफोडे पोलिसांच्या जाळ्यात
औरंगाबाद : शहर व परिसरात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखा आणि उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपींमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरमितसिंग तारासिंग कल्याणी ऊर्फ टॉम (४३), कर्नलसिंग तारासिंग कल्याणी (२७), अनिल प्रकाश पौळ (२०) व संतोष राजू खरे (१९, रा. सर्व मिलिंदनगर, उस्मानपुरा) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल १७० ग्रॅम सोने व चांदीचे भांडे, असा सव्वापाच लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
रेकॉर्डवरील आरोपी टॉम हा चोरीचा ऐवज विक्रीसाठी घेऊन उस्मानपुरा परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून गुन्हे शाखा पोलिसांना समजली. माहिती मिळताच सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या आणि उस्मानपुरा ठाण्याच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी खबऱ्याने सांगितलेल्या ठिकाणी सापळा रचला. तेथे टॉम पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे त्यावेळी चांदीच्या काही वस्तू आढळून आल्या. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच टॉमने तोंड उघडले. हा चोरीचा ऐवज असल्याचे त्याने कबूल केले. साथीदार कर्नलसिंग आणि अनिल यांच्या मदतीने काही दिवसांपूर्वी गादिया विहार परिसरातील राजनगर येथील अॅड. गजेंद्र शिरसीकर यांचे घर फोडून देवपूजेची चांदीची भांडी, तसेच काही सोन्याचे दागिने चोरी केल्याचे त्याने सांगितले. मग पोलिसांनी शोध घेऊन त्याचे साथीदार कर्नलसिंग आणि अनिल या दोघांना अटक केली.
तसेच टॉमने अन्य एक साथीदार संतोष खरे याच्यासोबतही गुन्हा केल्याची माहिती दिली होती. त्यावरून उस्मानपुरा पोलिसांनी शनिवारी संतोषला अटक केली. त्याला खाक्या दाखविताच त्यानेही टॉम आणि अजय ठाकूर (रा. सातारा) याच्या मदतीने काही दिवसांपूर्वी श्रेयनगरातील जगदीश मुंदडा यांचे घर फोडून लाखो रुपयांचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली.