पंचविशीचा तरूण बनला चाळीस मुलांचा बाप
By Admin | Updated: May 27, 2014 00:55 IST2014-05-27T00:12:09+5:302014-05-27T00:55:05+5:30
प्रताप नलावडे , बीड बहिणीचा अकाली मृत्यू आणि तिच्या दीड वर्षाच्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी पेलताना अवघ्या १६ वर्षाच्या तरूणाला समाजातील अनाथ मुलाची अवस्था सतत अस्वस्थ करीत राहिली.

पंचविशीचा तरूण बनला चाळीस मुलांचा बाप
प्रताप नलावडे , बीड ेसात महिन्याच्या गरोदर बहिणीचा अकाली मृत्यू आणि त्यानंतर तिच्या दीड वर्षाच्या मुलीला सांभाळण्याची जबाबदारी पेलताना अवघ्या १६ वर्षाच्या तरूणाला समाजातील अनाथ मुलाची अवस्था सतत अस्वस्थ करीत राहिली. या अस्वस्थतेनेच त्याला प्रेरणा दिली आणि त्यानंतर अवघ्या वर्षभरात तो बनला १० मुलांचा बाप. नऊ वर्षापूर्वी सुरू झालेली अनाथांची ही कहाणी आता ४० मुलांवर येऊन ठेपली आहे. गेवराई येथील संतोष गर्जे या तरूणाने जिद्दीने हा ४० मुलांचा संसार पत्नी प्रीतीसह जिवाच्या कराराने पेलला आहे. अनाथांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी त्याने उचललेले पाऊल आज एक चळवळ बनले आहे. संपूर्ण राज्यभरात संतोषच्या या कामाची आवर्जून दखल घेतली जात आहे. ऊस तोडणी कामगाराचा या मुलाने सुरूवातीच्या काळात अक्षरश: भीक मागून या मुलांचा सांभाळ केला. लोकांनी सुरूवातीला वाट्टेल ते सुनावले परंतु जेव्हा त्यांना त्याच्यातील अंतरिक तळमळ दिसू लागली तेव्हा मदतीचा हातही याच लोकांनी पुढे केला. संतोषच्या या पितृत्वाची कहाणीही चटका लावणारी आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी त्याच्या बहिणीचा अकाली मृत्यू झाला आणि तिच्या दीड वर्षाच्या मुलीचे पालकत्व त्याच्याकडे आले. तिचा सांभाळ करताना त्याला अनेक कठीण प्रसंगातून जावे लागले. यातूनच त्याला अनाथ मुलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, याची जाणीव झाली. खिशात एक रूपयाही नसताना तो विचार करीत होता समाजातील अनाथांचे पितृत्व स्वीकारण्याचा. गावोगाव भटकंती करून त्याने सुरूवातीला वेश्यांची, अकाली पितृत्व हरवलेली, तुरूंगात असणार्या कैद्यांची मुले त्याने सांभाळण्यासाठी आपल्याकडे घेतली आणि यातूनच सुरूवात झाली ती सहारा अनाथालय परिवाराची. आई फाऊंडेशनची स्थापना करून त्या मार्फत संतोषने सुरू केलेली ही चळवळ आता ४० मुलांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या संपूर्ण पालनपोषण करण्याची जबाबदारी संतोष पेलत असताना अनेक अडचणीलाही त्याला तोंड द्यावे लागते. अगदी किराणा माल आणण्यापासून त्याला अडचणीला तोंड द्यावे लागते, परंतु पित्याच्या मायेने हा तरूण या सगळ्यांचा सांभाळ करीत आहे. आज बीड, सोलापूर, बार्शीसह विदर्भातील मुलंही त्याच्या अनाथालयात आहेत. त्यांना चांगले शिक्षण देणे आणि स्वत:च्या पायावर उभे करण्याची जिद्द संतोष आणि प्रीतीला सतत कार्यरत ठेवते. गेवराईत तीन एकराच्या जागेत संतोषने पत्र्याचे शेड ठोकून आपला हा ४० मुलांचा प्रपंच थाटला आहे. तो स्वत:ही आपल्या पत्नीसह तेथेच राहतो. त्याच्यासह पाच जण मुलांचे संगोपन करतात. ६ ते १८ वयोगटाची या मुलांना सहारा अनाथालय म्हणजे स्वत:चे घरच वाटते. हे तर माणुसकीचे घर गेवराई येथील सहारा अनाथालय माणुसकीचे अनोखे घर बनले आहे. जात-पात आणि धर्मापासून सहारा परिवारातील मुलं कोसो दूर आहेत. वेगवेगळ्या परिसरातून आणि वातावरणातून आलेली ही मुलं इथं अगदी प्रेमानं आणि मायेने राहताना दिसतात. रक्ताच्या नात्यापेक्षाही अपघाताने जोडली गेलेली ही नाती जिवापाड सांभाळतात.