टेंडर न काढल्याने नालेसफाईची मनपाकडून औपचारिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:02 IST2021-05-17T04:02:16+5:302021-05-17T04:02:16+5:30
औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने कंत्राटदारामार्फत काम न करता, स्वतःच्या यंत्रणेकडून नालेसफाईचा निर्णय घेतला. शहरातील जवळपास ७० टक्के नाले साफ ...

टेंडर न काढल्याने नालेसफाईची मनपाकडून औपचारिकता
औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने कंत्राटदारामार्फत काम न करता, स्वतःच्या यंत्रणेकडून नालेसफाईचा निर्णय घेतला. शहरातील जवळपास ७० टक्के नाले साफ करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी तो चुकीचा असल्याचे समोर येत आहे. जुन्या शहरातील अनेक नाले आजही तुडुंब भरलेले आहेत. त्यातच आता अवकाळी पावसालाही सुरुवात झाली आहे. यंदाही पाऊसच नालेसफाई करणार हे निश्चित.
शहरात २० प्रमुख नाले आहेत. या प्रमुख नाल्यांना जोडणारे लहान-मोठे जवळपास ७० नाले आहेत. महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी टेंडर काढण्यात येते. नालेसफाईवर जवळपास दोन कोटी रुपये खर्च करण्यात येतात. यंदा प्रशासनाने खासगी कंत्राटदारामार्फत नालेसफाई न करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या यंत्रणेकडूनच नालेसफाई करण्याचे आदेश देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाल्यांची सफाई झाली पाहिजे, अशी सक्त ताकीद सर्व वार्ड अभियंत्यांना देण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील नाल्यांची ७० टक्के सफाई झाल्याचा दावा केला आहे. दरवर्षी पदाधिकारी नाल्यांच्या सफाईची पाहणी करीत होते. आता पदाधिकारी नसल्याने पाहणी करणार तरी कोण?
काळा दरवाजा येथील नाला तुडुंब भरलेला
काळा दरवाजा ते किलेअर्ककडे जाणारा नाला तुडुंब भरलेला आहे. महापालिकेच्या यंत्रणेने नाल्यातील एक टोपलेही घाण काढली नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. दरवर्षी किमान दर्शनी भागातील गाळ काढण्यात येतो. या वर्षी पावसाळ्याला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असतानाही कामाला सुरुवात झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नाला साफ केला होता, परत घाण वाहून आली
काळा दरवाजा येथील नाल्यांची साफसफाई काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. पाण्यासोबत परत या ठिकाणी घाण आलेली आहे. लवकरच पुन्हा गाळ आणि घाण काढण्यात येईल, असे वार्ड अभियंता काशिनाथ काटकर यांनी सांगितले.