पाचही जागा बिनविरोध
By Admin | Updated: January 6, 2015 01:07 IST2015-01-06T01:05:26+5:302015-01-06T01:07:32+5:30
उमरगा : निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत उमरगा नगर परिषदेच्या प्रभाग सहाची पोटनिवडणूक बिनविरोध काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता़

पाचही जागा बिनविरोध
उमरगा : निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत उमरगा नगर परिषदेच्या प्रभाग सहाची पोटनिवडणूक बिनविरोध काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता़ बैठकीतील सामंजस्याच्या निर्णयानंतर इतर उमेदरांनी सोमवारी आपले नामनिर्देशनपत्र परत घेतले़ त्यामुळे उर्वरित पाचही उमेदवारांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड जाहीर केली़
उमरगा नगर पालिकेच्या प्रभाग सहाच्या निवडणुकीचा आखाडा चांगलाच पेटला होता़ पाच जागांसाठी २३ उमेदवारांनी २६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते़ ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत होती़ त्या पध्दतीने विविध पक्षांकडून प्रचार यंत्रणाही राबविण्यास सुरूवात झाली होती़ मात्र सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा व नागरी स्वच्छतेचा पश्न आदी मुद्द्यांमुळे उमेदवारांसह पक्षांना ही निवडणूक परवडणारी नव्हती़ त्यामुळे आमदार बसवराज पाटील, खासदार रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे प्रा़ जितेंद्र शिंदे, सुरेश बिराजदार, भाजपाचे कैलास शिंदे, बापूराव पाटील, माजी नगराध्यक्ष रज्जाक उत्तार, जितेंद्र शिंदे, विद्यमान उपनगराध्यक्ष धनंजय मुसांडे आदींची बैठक झाली़
या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आल्यानंतर इतरांनी आपले नामनिर्देशनपत्र वापस घेतले़ त्यानंतर दत्ता सदाशिव रोंगे (भाजपा), अत्तार वाहब रज्जाक (शिवसेना), संगिता राजेंद्र पतगे (काँग्रेस), सुनिता बळीराम सुरवसे (शिवसेना) व महानंदा मच्छिंद्र पाटील (राष्ट्रवादी) यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली़
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार उत्तम सबनीस, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉ़ संतोष ढेंगळे यांनी काम पाहिले़ (वार्ताहर)
उमरगा पालिकेच्या राजकीय इतिहासात प्रथमच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा आदी सर्वपक्षीयांनी एकत्रित बैठक घेवून निवडणूक बिनविरोध काढली आहे़ शहराच्या विकासासाठी हे राजकीय मनोमिलन मैलाचा दगड ठरणार असल्याची चर्चाही शहरात सुरू होती़
नळदुर्ग : येथील प्रभाग एकमधील नगरसेवक देविदास राठोड यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत होत असल्याचे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. दिवंगत नगरसेवक देविदास राठोड यांचे पूत्र निरंजन राठोड हे राष्ट्रवादीकडून तर वैभव जाधव हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
जिल्ह्यातील उमरगा येथील पाच तर तुळजापूर व नळदुर्ग येथील प्रत्येकी एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. यासाठी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ५ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. यात उमरगा येथील पाचही जागा बिनविरोध निवडून आल्या असून, तुळजापूर आणि नळदुर्ग येथील प्रत्येकी एका जागेसाठी आता १८ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
तुळजापूर : न. प. शहर हद्दवाढ प्रभाग क्रमांक पाच मधील एका सर्वसाधारण जागेसाठी नऊ उमेदवारापैकी पाच उमेदवारानी आपले अर्ज सोमवारी मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी काशीनाथ पाटील यांनी दिली. राष्ट्रवादीचे अमर हंगरगेकर, अमोल कुतवळ अनिल राठोड, हरिष रोचकरी हे रिंगणात राहिले आहेत.