जिल्ह्यात खत, बियाणे मुबलक
By Admin | Updated: May 28, 2014 00:22 IST2014-05-27T23:50:39+5:302014-05-28T00:22:00+5:30
बीड : खत, बियाणांसाठी मागील काही वर्षांपासून शेतकर्यांची धावाधाव होत होती. विशिष्ट बियाणांसाठी शेतकर्यांना लाठ्या-काठ्याही खाव्या लागल्या

जिल्ह्यात खत, बियाणे मुबलक
बीड : खत, बियाणांसाठी मागील काही वर्षांपासून शेतकर्यांची धावाधाव होत होती. विशिष्ट बियाणांसाठी शेतकर्यांना लाठ्या-काठ्याही खाव्या लागल्या. यंदा मात्र अशी स्थिती राहणार नाही. कारण कृषी विभागाने मुबलक प्रमाणात बियाणे, खत उपलब्ध केले आहे. जिल्ह्याचे सर्वसाधारण खरीप क्षेत्र ५ लाख ६५ हजार ७०० हेक्टर आहे. जवळपास साडेतीन लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने १६ लाख ९६ हजार कापूस बियाणांच्या पाकिटांची मागणी केली होती. त्यानुसार ९ लाख १७ हजार पाकिटे मे अखेर उपलब्ध झाली आहेत. या शिवाय २ लाख ४ हजार मे. टन खताची मागणी नोंदविली होती. त्यापैकी ६३ हजार मे. टन खत प्राप्त झाले आहे. उर्वरित खत व बियाणे टप्प्याने टप्प्याने प्राप्त होणार आहेत. कणक बियाणांची मागणी कायम असून यंदा साडेतीन लाख पाकिटे येणार आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी दिली. खरीप हंगामात तूर, मुग, उडीद, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग, मका, बाजरी ही पिकेही घेतली जातात. या पिकांचाही मुबलक साठा असल्याचे ते म्हणाले. मागणी नोंदविल्या प्रमाणे टप्प्या- टप्प्याने बियाणे व खते उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. बियाणे, खतासाठी शेतकर्यांना रांगेत थांबावे लागण्याची परिस्थिती यंदा नाही, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी सांगितले. अडवणूक झाल्यास किंवा मूळ किमतीच्या अधिक पैसे मागितले तर तक्रारी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. सोयाबीन पेरणीसाठी वापरा घरचे बियाणे शेतकर्यांनी सोयाबीनचे बियाणे विकत घेण्यापेक्षा घरचेच बियाणे लागवड करावे, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी केले आहे. घरच्या बियाणांची उगवण क्षमता अधिक चांगली आहे. लागवड करण्यापूर्वी बियाणांवर पाणी शिंपडावे. त्यानंतर थायरम किंवा बाविस्टीन लावून त्याची पेरणी करावी. त्यानंतर सोयाबीन लवकर उगवून येण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) जिल्ह्यात बियाणे, औषधी, खत विकण्यासाठी यंदा कृषी विभागामार्फत एक हजार परवाने वितरित करण्यात आले आहेत. यावेळी परवाने प्रथमच आॅनलाईन झाले आहेत. त्यामुळे कृषी परवान्यांवर थेट कृषी विभागाचे लक्ष राहणार आहे. बेकायदेशीररित्या खत, बियाणे विक्री करणार्यांवर तसेच खत, बियाणांची परजिल्ह्यात विल्हेवाट लावणार्यांविरूद्ध कृषी विभागाची करडी नजर आहे. जिल्ह्यात एकूण ३६ पथके तैनात करण्यात आली आहेत. पीक मागणी पुरवठा कापूस १६ लाख ९६ हजार ९ लाख १७ हजार बाजरी १८७५ ३७६ तूर १७२२ २९९ उडीद २२३५ ६४४ भुईमूग १०५० १४४ मका १८९० २०० सोयाबीन ५९२६० १३३७०