जागेसाठी शेणी ग्रामस्थांचा उपोषण लढा..!
By Admin | Updated: December 13, 2014 23:53 IST2014-12-13T23:53:48+5:302014-12-13T23:53:48+5:30
लातूर : अहमदपूर तालुक्यातील शेणी हे गावं. या गावच्या दलित वस्तीतील समाजमंदिराच्या जागेवर सवर्णांनी केलेल्या अतिक्रमणाविरुध्द मातंग समाजाच्या बांधवांनी ६३ दिवसाच्या उपोषणाचा लढा दिला.

जागेसाठी शेणी ग्रामस्थांचा उपोषण लढा..!
लातूर : अहमदपूर तालुक्यातील शेणी हे गावं. या गावच्या दलित वस्तीतील समाजमंदिराच्या जागेवर सवर्णांनी केलेल्या अतिक्रमणाविरुध्द मातंग समाजाच्या बांधवांनी ६३ दिवसाच्या उपोषणाचा लढा दिला. धनदांडग्याच्या बाजूने उभ्या राहीलेल्या ग्रामपंचायतीविरुध्द दोन न्यायालयात निकाल जिंकला. तरीही जागा मिळत नसल्यावर पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसून ८३ व्या दिवशी आपली हक्काची जागा मिळविलीच. आता ज्या माणसाने या लढाईत पुढाकार घेतला त्या कार्यकर्त्याच्या घरावर केलेल्या अतिक्रमणाविरुध्द लढा सुरू केला आहे. या लढ्याच्या उपोषणाला २८९ दिवस पूर्ण होताहेत, हे विशेष.
अहमदपूर तालुक्यातील शेणीच्या मातंग कार्यकर्त्याच्या लढ्याची गोष्टच निराळी. वस्तीतील मरिआईच्या मंदिराजवळ एक गायरानाची जागा. १९५४ पासून तिथे मातंग समाज रहायचा. तिथे तत्कालीन खा. जयवंतराव आवळे यांच्या निधीतून समाजमंदिराची मागणी केली. ती मंजूर झाली. पण ज्या जागेवर समाजमंदिर मंजूर झाले त्या जागेवर गावातील एका सवर्ण व्यक्तीने अतिक्रमण केले. ती जागा मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी निवेदने दिली. परंतु मिळाली नाहीच उलट सारा गाव अंगावर आला. कार्यकर्त्यांनी लातूरला येत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकुमार रायवाडीकर यांच्यापुढ्यात गाऱ्हाणे मांडले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा सल्ला देत स्वत: नियोजन केले. पहिले उपोषण दहाव्या दिवशी बीडीओच्या पत्रावर सुटले. परंतु पुन्हा प्रशासन अतिक्रमण केलेल्यांकडे आठ अ चा उतारा असल्याचे म्हणून थांबले. त्याला धक्का द्यायला पुन्हा उपोषण सुरु झाले. त्याला ४८ दिवस झाल्यावर अतिक्रमण करणारे न्यायालयात गेले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या बाजूने निर्णय दिला. तोही गाव आणि प्रशासनाने नाकारला. न्यायालयाच्या निकालानंतरही गावाने ग्रामसभेत निकाल काहीही येवो जागा ‘जैसे थे’ ठेवण्याचा ठराव घेतला. मग जिल्हा न्यायालयात अपिल केले गेले. तिथेही आंदोलक जिंकले. परंतु तरीही जागा रिकामी करुन देण्यास प्रशासन धजेना. मग आमरण उपोषण सुरू झाले. गाव, तालुका आणि जिल्ह्याचे अधिकारी दाद लागू देत नाहीत म्हंटल्यावर पार मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रपती कार्यालयापर्यंत निवेदने देत न्यायालायाचा मान राखत न्यायाची विनंती केली. उपोषणाच्या ६३ व्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी देताच जागा रिकामी झाली. १ आॅगस्टला अण्णाभाऊ साठे जयंती करुन पंचशील ध्वज लावित आंनंदोत्सव केला. किती लोक दवाखान्यात नेले गेले. ते पुन्हा आंदोलनस्थळी आले. पोलिस आले, गुंड आले पण आंदोलन थांबले नाही. अखेर त्याचा जय झालाच. परंतु कार्यकर्त्यांच्या नशिबाचे भोग पहा, ज्या बळी बेले नामक कार्यकर्त्यांने हे प्रकरण तडीस नेण्यासाठी आटापिटा केला.
प्रशासन आणि गावाने त्याच्या घरावर बुलडोझर फिरवून समाजमंदिरावर अतिक्रमण करणाऱ्याला तिथे बसविले. शेणीचे समाजबांधव मागे हटले नाहीत. पुन्हा आंदोलन सुरु केले. समाजमंदिराचे आंदोलन आता बळीच्या घरासाठी सुरू झाले. २६३ दिवस हे आंदोलन चालू आहे. बळी बेलेला गायरानावर वसलेले वडीलोपार्जित स्वत:चे हक्काचे घर पाहीजे आहे. या आंदोलनाच्या यशासाठी कार्यकर्ते आसुसले आहेत. (प्रतिनिधी) ४
गेल्या सहा दिवसांपासून उपोषणास बसलेल्या बापूराव बेले, माधवराव बेले व राबनबी शेख यांची प्रकृती खालावली आहे़ शुक्रवारी रात्री नातेवाईकांनीच त्यांना रूग्णालयात दाखल केले़ पोलिस हद्दीच्या वादावरून प्रकृती खालावलेली असतानाही शिवाजीनगर व एमआयडीसी पोलिसांनी दुर्लक्ष केले़