आळंद येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून आळंद, उमरावती, जातवा, नायगव्हाण, सताळा, पिंपरी, बोरगाव अर्ज, पेंडगाव, पाडळी, निमखेडा, जळगाव मेटे, गुमसताळ, गेवराई पायगा, गेवराई गुंगी या चौदा गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. सध्या विहिरींची पाणीपातळी चांगली असल्याने रबी पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त आहे. यामुळे रबी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहेत. मात्र, महावितरण कंपनीकडून अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने विद्युत पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे विद्युत पंप जळत असल्याने पिके वाया तर जात आहेतच, शिवाय विद्युत पंप दुरुस्तीचा अतिरिक्त भार सहन करावा लागत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. महावितरण कंपनीने योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
फोटो ओळ : आळंद परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने जळालेले विद्युत पंप दुरुस्त करताना कारागीर राजू पांडे.