पट्टीसाठी शेतकर्‍यांची हेळसांड

By Admin | Updated: May 24, 2014 00:44 IST2014-05-24T00:25:37+5:302014-05-24T00:44:07+5:30

नांदेड : गत काही दिवसांपासून बाजारावर तेजी नसल्याने शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार मंद गतीने सुरु आहेत.

Farmers' resignation for strip | पट्टीसाठी शेतकर्‍यांची हेळसांड

पट्टीसाठी शेतकर्‍यांची हेळसांड

नांदेड : गत काही दिवसांपासून बाजारावर तेजी नसल्याने शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार मंद गतीने सुरु आहेत. विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे विशिष्ट वेळेत देण्याचा नियम व्यापार्‍यांकडून धाब्यावर बसविण्यात येत आहे. यामुळे शेतकर्‍यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. या प्रकाराकडे मात्र बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात हळदीसह भुईमूग, ज्वारी, गहू आदी पिकांची आवक सुरु आहे. त्यात हळदीची आवक प्रचंड असल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. आडत्याने आपल्याकडील शेतमालाची खुल्या पद्धतीने विक्री करु नये, असा लिखित नियम बाजार समिती प्रशासनाने काढला आहे. यामुळे प्रत्येक आडत दुकानदार बीटाद्वारेच पक्या पावतीद्वारे हळदीची विक्री करीत आहे. मात्र एका आडत दुकानावर बीट येण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागत आहे. ज्या शेतकर्‍यांचा शेतमाल लिलावामध्ये विक्री केला. त्या शेतकर्‍यांना आडत व्यापार्‍यांनी चोवीस तासांच्या आत पट्टी देण्याचा नियम आहे. परंतु शेतमालाची विक्री करुनही पंधरा ते पंचवीस दिवस शेतकर्‍यांना पैसे मिळत नाहीत. या प्रकाराने शेतकरी पुरता हताश झाला आहे. बाजारात पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याचे कारण दाखव खरेदीदारही खरेदीकडे पाठ फिरवत आहेत.परिणाम शेतमाल मोंढ्यात आणूनही विक्री होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस वाट पाहत लागत आहे. शेतकर्‍यांनी एकाच वेळी विक्रीसाठी हळद बाजारात आणल्याने व्यापार्‍यांना खरेदीदारांची मनधरणी करावी लागत आहे. बीट येण्यासाठी पंधरा ते वीस दिवस तर विक्री केलेल्या हळदीचे माप करण्यासाठी पुन्हा दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर शेतमालाची पट्टीही पंधरा ते वीस दिवसांपर्यंत येत नाही. शेतमाल विक्रीसाठी मोंढा बाजारात आणूनही पैशासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. खरीप पेरणीचा हंगाम जवळ येवून ठेपल्याने खत-बियाणाच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांपुढे अडचणी वाढत आहेत. (प्रतिनीधी)शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या शेतमालाची पट्टी चोवीस तासांत देण्याचा नियम आहे, परंतु शेतकर्‍यांना पंधरा ते वीस दिवसांपर्यंत व्यापार्‍यांकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. खरीप हंगाम जवळ आल्यामुळे व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना शेतमालाचे तत्काळ पैसे द्यावेत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.

Web Title: Farmers' resignation for strip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.