पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेला घरघर
By Admin | Updated: June 9, 2014 01:08 IST2014-06-09T00:51:56+5:302014-06-09T01:08:32+5:30
सुरेश चव्हाण , कन्नड ग्रा. पं. मध्ये आपल्या नेतृत्वाखाली, ग्रामस्थांच्या सहभागाने व शासनाच्या सहकार्याने सत्यात आणण्याचा ‘पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना’ हा उपक्रम शासनाने आणला.

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेला घरघर
सुरेश चव्हाण , कन्नड
‘समृद्ध ग्रामे, संपन्न ग्रामस्थ’ हे स्वप्न ग्रा. पं. मध्ये आपल्या नेतृत्वाखाली, ग्रामस्थांच्या सहभागाने व शासनाच्या सहकार्याने सत्यात आणण्याचा ‘पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना’ हा उपक्रम शासनाने आणला. मात्र हा उपक्रम राबविण्याबाबत ग्रा. पं.नी उदासीनता दाखविल्याने या योजनेलाच घरघर लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून योजनेच्या तिसऱ्या (अंतिम) वर्षीच्या परीक्षेत तालुक्यातील केवळ चारच ग्रा. पं. पास झाल्या आहेत.
पर्यावरण समतोल राखण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा विकास करणे व त्यासाठी लोकसहभाग मिळविणे, पर्यावरणाचे भान ठेवून भौतिक सुविधा उपलब्ध करणे व इको व्हिलेजची संकल्पना राबवून समृद्ध ग्राम निर्माण करणे, मोठ्या ग्रा. पं. ना पर्यावरण विकास आराखडा व ग्रामविकास आराखडा तयार करून अशा मोठ्या गावात शहरी तोडीच्या सुविधा निर्माण करून त्यांना विकास केंद्रे म्हणून विकसित करणे आदी उद्देश ही योजना राबविण्यामागे शासनाचा आहे.
ही योजना तीन वर्षांसाठी आहे. म्हणजे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष याप्रमाणे ग्रा. पं.चे वर्षासाठी ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे मूल्यांकन केले जाईल व दरवर्षी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ग्रा. पं.ना लोकसंख्येच्या आधारावर निधी उपलब्ध करून दिला जाईल.
प्रथम वर्षी लोकसंख्येच्या किमान ५० टक्के झाडे लावून जगविली पाहिजे व पुढे दोन वर्षात उर्वरित किमान ५० टक्के आणखी झाडे लावून जगविली पाहिजेत.
६० टक्के हगणदारीमुक्त ग्रा. पं. व त्यानंतरच्या दोन वर्षांत निर्मलग्राम करणे बंधनकारक, किमान ६० टक्के थकबाकीसह करवसुली करणे आवश्यक, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात भाग घेतला पाहिजे व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची हमी दिली पाहिजे.
याप्रमाणे तीन वर्षांसाठी वेगवेगळ्या कसोट्या आहेत. भाग घेतलेल्या ग्रा. पं. ने प्रथम वर्षीच्या कसोटीत यश मिळविले तर शासनाने लोकसंख्येच्या आधारावर ठरवून दिलेल्या निधीपैकी तीन समान हप्त्यांपैकी एक हप्ता, दुसऱ्या वर्षी कसोटी उत्तीर्ण केल्यास दुसरा हप्ता व अंतिम वर्षी कसोटी पास झाल्यास उर्वरित तिसरा हप्ता देण्यात येईल.
सन २०१४-१५ या वर्षासाठी ४० ग्रा. पं.नी प्रथम वर्षासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत, तर केवळ औराळा ग्रा. पं.ने द्वितीय, तर हतनूर आणि लंगडातांडा ग्रा. पं.नी तृतीय वर्षाच्या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत.
कन्नड तालुक्यात १३७ ग्रा. पं. आहेत. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या परीक्षांना बसणाऱ्या ग्रा. पं. पाहता ही संख्या कमीच आहे. यावर चिंतन होण्याची गरज आहे.
या योजनेत सन २०१०-११ या वर्षासाठी बहिरगाव, भोकनगाव, लंगडातांडा, धामणी, जैतखेडा तांडा, निपाणी, अंबाला, देवळाणा, डोणगाव, कानडगाव, मोहाडी, आमदाबाद, वडाळी, मेहगाव व टाकळी ल. या गावांनी प्रथम वर्षाची कसोटी उत्तीर्ण केली.
दुसऱ्या वर्षी यापैकी बहिरगाव, भोकनगाव, लंगडा तांडा, धामणी, बिपखेडा, देवळाणा, डोणगाव, कानडगाव, मेहगाव व अंबाला या दहा गावांनी निकष पूर्ण केले.
तिसऱ्या वर्षी मात्र यापैकी फक्त बहिरगाव, देवळाणा, बिपखेडा व भोकनगाव या चारच गावांनी निकष पूर्ण केले.