तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By Admin | Updated: May 24, 2014 01:35 IST2014-05-24T00:52:21+5:302014-05-24T01:35:05+5:30

संजय खाकरे, परळी महावितरण कार्यालयाकडून वीज बिल न भरणार्‍या ग्राहकांवर सध्या कठोर कारवाई करण्यात येत आहे.

Electricity supply of three thousand customers broke | तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

संजय खाकरे, परळी महावितरण कार्यालयाकडून वीज बिल न भरणार्‍या ग्राहकांवर सध्या कठोर कारवाई करण्यात येत आहे. वीज वितरण कंपनीकडून परळी शहरात थकित वीज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी शहरातील सुमारे ३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. आणखी अनेक ग्राहकांकडे थकित बिल असल्याने यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्टÑ राज्य वीज वितरण कंपनीच्या परळी येथील कार्यालयाने थकित वीज बिल वसुलीच्या मोहिमेला शुक्रवारपासून सुरुवात केली आहे. या मोहिमेत ज्या ग्राहकांकडे थकित वीज बिल आहे, अशा ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. परळीत घरगुती, वाणिज्य, औद्योगिक विजेची १४ हजार ग्राहकांकडे ६ कोटी ७४ लाख रुपये वीज बिल थकबाकी आहे. या अगोदर संबंधित ग्राहकांना वेळोवेळी थकित वीज बिल भरण्याबाबत सूचना देऊनही त्यांनी बिले न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने हा कारवाईचा बडगा उगारला. शहरात ठिकठिकाणी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा ताफा कारवाईसाठी सकाळपासूनच रवाना झाला होता. ज्या ग्राहकांकडे थकित वीज बिल आहे अशा ग्राहकांचे वीज कनेक्शन कर्मचार्‍यांमार्फत तोडण्यात आले. साहित्यही वीज वितरण कंपनीने जप्त केले. मे महिन्यात यापैकी ४ कोटी वसुलीचे उद्दिष्ट वीज वितरण कंपनीकडे पुढे आहे. ४ कोटीचे उद्दिष्ट असल्यामुळे वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी या कारवाईला वेग दिला आहे. २२ मे पर्यंत ८० लाख वसुली झाली असल्याचे वीज वितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता बी.जी. पवार यांनी सांगितले. १ मेपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. मोहीम सुरू करुन २३ दिवस उलटले तरी ग्राहकांनी आपले थकित वीज बिल महावितरणकडे जमा केले नाही. त्यामुळे महावितरण कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी ज्या ग्राहकांनी थकित वीज बिल ठेवले आहे अशांचे वीज कनेक्शन तोडले. वीज बिल भरा, कनेक्शन तोडणे टाळा वीज बिल भरुन नागरिकांनी वीज वितरण कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता बी.जी. पवार यांनी केले आहे. ‘वीज बिल भरा आणि कनेक्शन तोडणे टाळा’ अशी मोहीमच महावितरण कार्यालयाने सुरू केली असल्याचे चित्र परळी येथे दिसून येत आहे. जे ग्राहक आपले राहिलेले थकित वीज बिल भरणार नाहीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारुन वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असा इशारा महावितरण कंपनीने दिला आहे. बड्या हस्ती थकबाकीदारांनीही आपले थकित वीज बिल भरावे अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले. या कारवाया उपकार्यकारी अभियंता बी.जी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सुहास मिसाळ, अमोल पिंगळे तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांमार्फत केली जात आहे. थकित वीज बिल ग्राहकांची या कारवाईमुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Web Title: Electricity supply of three thousand customers broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.