ग्रामीण राजकारणाचा उडणार धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST2020-12-17T04:27:41+5:302020-12-17T04:27:41+5:30

जिल्ह्यात आचारसंहिता लागू :१५ जानेवारीला मतदान, १८ जानेवारी रोजी मतमोजणी औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण राजकारणाचा धुराळा उडणार ...

The dust of rural politics will fly | ग्रामीण राजकारणाचा उडणार धुराळा

ग्रामीण राजकारणाचा उडणार धुराळा

जिल्ह्यात आचारसंहिता लागू :१५ जानेवारीला मतदान, १८ जानेवारी रोजी मतमोजणी

औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण राजकारणाचा धुराळा उडणार आहे. ६१८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान आणि १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. ११ डिसेंबरपासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ७ ग्रामपंचायतींच्या तसेच डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या ६११ अशा एकूण ६१८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यात ५० टक्के किंवा त्याहून अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्या पूर्ण जिल्ह्यात आचार संहिता लागू राहणार आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील ८६५ ग्रामपंचायतींपैकी ६१८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहील. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत सुट्या वगळून उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ४ जानेवारी असून त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वा. ते सायं. ५.३० वा. या वेळेत मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. विधानसभा मतदारसंघनिहाय २५ सप्टेंबर रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. १४ डिसेंबर रोजी मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

लोकअदालतमध्ये जुळून आले १५ संसार

औरंगाबाद : कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे कौटुंबिक वादविवादाच्या घटना वाढत असून कौटुंबिक न्यायालयाने लोकअदालतच्या प्रमुख न्यायाधीश आय.जे. नंदा यांच्या उपस्थितीत १५ जोडप्यांचे संसार जुळविण्यात यश मिळविले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि कौटुंबिक न्यायालयातर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे कौटुंबिक न्यायालय इमारत येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश ए.ए. आयाचित यांची उपस्थिती होती. कौटुंबिक न्यायालयात एकूण ४३ प्रकरणे होती. त्यात दोन्ही बाजूची ३० जोडपी हजर राहिली व एकूण २७ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. १३ प्रकरणांमध्ये उभय पक्षकार गैरहजर राहिले, तर १५ प्रकरणांमधील जोडपी आनंदाने एकत्र नांदण्यास गेली. पॅनल क्र. १ वर निवृत्त न्यायाधीश टी.बी. जाधव, अ‍ॅड माधुरी अदवंत, भारत काळे यांनी तर पॅनल क्र.२ यावर निवृत्त न्यायाधीश के. के. गायकवाड, एम.एस. कदम, ज्योती सपकाळे यांनी काम पाहिले. प्रबंधक एस.आर.दानी, अधीक्षक अनिल जाधव आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: The dust of rural politics will fly