कोरड्या प्रकल्पांत चर खोदणार
By Admin | Updated: May 8, 2016 01:09 IST2016-05-08T01:00:04+5:302016-05-08T01:09:33+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील जनता भीषण दुष्काळाने होरपळत आहे. जनतेला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

कोरड्या प्रकल्पांत चर खोदणार
औरंगाबाद : मराठवाड्यातील जनता भीषण दुष्काळाने होरपळत आहे. जनतेला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तीव्र पाण्याची टंचाई लक्षात घेऊन शहरे व गावागावांसाठी पुढील ४० दिवस पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली.
दुष्काळामुळे पाणीसाठे कोरडे पडत असून, भूगर्भातील पाणीपातळीही खालावली आहे. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असली तरी आहे त्या परिस्थितीत गावागावांना व शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे.
सध्या विभागातील धरणे, मध्यम प्रकल्प व तलावांमध्ये २ टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. ३ हजार ३५० टँकर सुरू असून, ६ हजार विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सुमारे ६ हजार गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.
मोठ्या धरणांपैकी मांजरा, तेरणा, माजलगाव, सिना-कोळेगाव, मनार ही धरणे कोरडी पडली आहेत. जायकवाडीतील मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. जायकवाडीतील गाळ काढण्याचे अजून काहीही नियोजन नाही. मनपा असलेल्या लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा होतो आहे. तर परभणी, नांदेड, औरंगाबाद या शहरांना सिद्धेश्वर, जायकवाडी, विष्णूपुरीमधून पाणी दिले जात आहे. नगरपालिका असलेल्या बीड, उस्मानाबादला, माजलगाव व उजनीमधून पाणीपुरवठा होत आहे. केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब या शहरांना टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.