कळंब-परंड्यावर टंचाईचे सावट
By Admin | Updated: August 7, 2014 02:05 IST2014-08-06T00:56:20+5:302014-08-07T02:05:20+5:30
उस्मानाबाद : जून-जुलै महिना कोरडा गेल्यानंतर आॅगस्टमध्येही वरुणराजाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे.

कळंब-परंड्यावर टंचाईचे सावट
उस्मानाबाद : जून-जुलै महिना कोरडा गेल्यानंतर आॅगस्टमध्येही वरुणराजाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे. विशेषत: कळंब-परंडा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने येत्या १५ आॅगस्टपर्यंत दमदार पाऊस न झाल्यास या दोन्ही शहरांना टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत. या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे.
जिल्ह्याची पावसाची सरासरी ६६७.५ टक्के इतकी आहे. मात्र जुन-जुलै महिन्यामध्ये अवघा १५२.९ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊसही जिल्ह्याच्या ठराविक भागात झालेला असल्याने कळंब-परंड्यासह अनेक भागात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरी विभागातील पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. मात्र कळंब आणि परंडा नगर पालिका क्षेत्रात येत्या १५ आॅगस्टपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यास येथे पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
कळंबसाठी चोराखळी तर परंडा शहरासाठी सीना-कोळेगाव प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येकी २० टँकरची आवश्यकता भासणार असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २११ प्रकल्पात केवळ ४ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्यात दोन तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, एका नळयोजनेची विशेष दुरुस्तीही करण्यात येणार आहे. या बरोबरच टंचाईग्रस्त भागात ४१ नवीन विंधन विहिरी घेण्याचे नियोजन असून, यातील ३४ विंधन विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय ४२८ विहीरी तसेच विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, ७६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.(प्रतिनिधी)
तीन लाखावर शेतकऱ्यांना मदत
फेब्रुवारी, मार्च २०१४ मध्ये झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यात ३ लाख २८ हजार २१० शेतकरी बाधित झाले होते. तसेच जिल्ह्यातील १ लाख ७६ हजार ३३४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांसाठी १९१.८४ लाख एवढा निधी मिळाला असून, त्यापैकी १९८ कोटी ६४ लाखाच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असून, या माध्यमातून ३ लाख २१ हजार ९० शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ७ हजार १२० शेतकऱ्यांना निधीचे वाटप करण्यात येत असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.