पोळ्यावर दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: August 20, 2014 00:59 IST2014-08-20T00:32:27+5:302014-08-20T00:59:35+5:30
औरंगाबाद : सर्जा-राजाचा पोळा सण अवघ्या ४ -५ दिवसांवर आलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही, त्यामुळे नदी-नाले, विहिरी जलसाठे जवळपास कोरडे आहेत.

पोळ्यावर दुष्काळाचे सावट
औरंगाबाद : सर्जा-राजाचा पोळा सण अवघ्या ४ -५ दिवसांवर आलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही, त्यामुळे नदी-नाले, विहिरी जलसाठे जवळपास कोरडे आहेत. पावसाळा आता केवळ महिनाभर राहिला असून, दुष्काळाच्या चिंतेने बळीराजा चिंतित झाला आहे; खरीप हंगाम तर गेल्यातच जमा असून चाऱ्याअभावी पशुधनही संकटात सापडले आहे. बाजारही थंडावले आहेत.
आतापर्यंत केवळ भीजपाऊस झाला आहे. त्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरणी केली खरी; पण त्यानंतर काही ठिकाणी पाऊस झाला नाही, त्यामुळे पिके सुकत आहेत. ज्यांच्याकडे विहिरीत पाणी आहे, अशांची पिके तग धरून आहेत. आता तर गेल्या १५ दिवसांपासून तर भीजपाऊसही नाही, त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
खरे तर काही भागांत पोळ्याला शेतकरी आर्थिक व्यवहार पूर्ण करतात. पोळ्यापर्यंत पिके आलेली असतात. यंदा तशी परिस्थितीच नाही. त्यामुळे पोळा दुष्काळाच्या चिंतेने काळवंडला आहे.
चिंचोली लिंबाजी, नेवपूर, वाकी, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर, वडोद, वाहेगाव, बरकतपूर, रायगाव, वाकद, गणेशपूर, शेलगाव, दिगाव, जामडी, दहीगाव परिसरात चालू हंगामात पावसाने सुरु वातीपासूनच लहरीपणा दाखवला आहे. पावसाअभावी चाराच शिल्लक नसल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साठवून ठेवलेल्या चाऱ्यावर व भुशावर आतापर्यंत जनावरांची गुजराण केली; परंतु आता तोही संपल्याने जनावरांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. चारा व पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने शेतकरी आपले पशुधन कवडीमोल भावाने बाजारात नेऊन विकत आहेत.
बोरगाव बाजार परिसरातही हेच चित्र आहे. बोरगाव बाजार, खातखेडा, मसला, कोटनांद्रा, डिडगाव, पिरोळा आदी गावांत तर महिनाभरापासून पाऊस पडला नाही. पावसाअभावी मका करपत आहे.
बोरगाव अर्ज परिसरात पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळा संपत आला तरीही पाऊस नसल्याने टँकरने तहान भागवावी लागत
आहे.
गुरांसाठी इतर ठिकाणाहून जास्त पैसे देऊन चारा मागवावा लागत आहे. हाताला काम नसल्याने शेतमजूर बसून असून, रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. लासूरगाव परिसरात पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच आहेत ती पिके हरिण फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.