अक्षयतृतीयेवर यंदा दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: April 22, 2015 00:41 IST2015-04-22T00:21:18+5:302015-04-22T00:41:25+5:30
बीड : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेवर यंदा दुष्काळाचे सावट स्पष्ट दिसून आले. बाजारात जसा हवा तसा उत्साह दिसला नाही

अक्षयतृतीयेवर यंदा दुष्काळाचे सावट
बीड : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेवर यंदा दुष्काळाचे सावट स्पष्ट दिसून आले. बाजारात जसा हवा तसा उत्साह दिसला नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील बारा मुद्रांक कार्यालयामध्ये केवळ ११६ दस्ताऐवजांची नोंद झाली. तर वाहन बाजारपेठा थंडच होत्या. सोने खरेदीची मात्र धूम असल्याचे दिसले.
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरील खरेदीने धनसंचय वाढतो. त्यामुळे दागिण्यांसह फ्लॅट, विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहनांची खरेदी केली जाते. सोने आणि फ्लॅट हा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून याकडे पाहिले जायचे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठांवर दिसून येत आहे. दरम्यान, शहरी भागातील बाजारपेठा या ग्रामीण भागातील लोकांवरच अवलंबून असतात. लग्नकार्ये व इतर साहित्य खरेदीसाठी ग्रामीण भागातील जवळपास सर्वजणच शहरी भागात येत असतात. यंदा अत्यल्प पाऊस झाला.
त्यामुळे गेल्या वर्षीचा दुष्काळ या वर्षी मुक्कामी थांबला. शेतकऱ्यांची उलाढाल थांबल्यामुळे त्यांच्या हातात पैसा आला नाही. त्यामुळे ते खरेदीला बाहेर पडले नाहीत.
याचा परिणाम जून महिन्यापासून बाजारपेठांवर दिसून येत होता. पहिल्या दोन महिन्यात पाऊस झाला नव्हता. तिसऱ्या महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. या पाण्यावरच फळबागा व भाजीपाला जोपासला जात होता. त्यात पुन्हा गारपीट व अवकाळी पाऊस झाला.
यामुळे शेतकरी पार कोलमडून पडला. दुष्काळाचे सावट आणखी दोन महिने राहणार आहे. येणाऱ्या पावसाळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
अक्षय तृतीयाच्या मुहर्तावर नवीन वस्तूची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मंगळवारी शहरात दीड कोटी रूपयाचे सोने खरेदी नागरिकांनी केले. यामध्ये ग्रामीण ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद होता. शहरीबाबूंनी मात्र सोने खरेदीला पसंदी दिली. याशिवाय गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीकडे मात्र नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
साडेतीन मुहर्तापैकी एक मुहर्त म्हणून अक्षयतृतीया दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. अक्षय तृतीयाच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केल्यामुळे धनाची भरभराटी होते असे मानले जाते. यामध्ये मंगळवारी सोने, चांदी खरेदीला मोठा प्रतिसाद होता. गुंजभर का होईना सोने खरेदी करण्याकडे नागरिकांचा भर होता. सोने खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्राहकांनी पाठ फिरविली. गत तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांनी सोने खरेदी केले नाही.
दुपार नंतर वाढली गर्दी
४बीड शहरात एकूण ९५ सोन्यांची दुकाने आहेत. दुपार नंतर सर्वच दुकानांवर ग्राहकांची गर्दी असल्याचे चित्र पहावयास मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्के सोन्याचे भाव वाढले असल्याचे येथील सुवर्णकार सचिन डहाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
आमरसावर ताव; बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी
अक्षयतृतीया जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच बाजारात आंबे खरदेसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आंब्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसे वाढलेले नाहीत. यावर्षी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे गावरान आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे बीडच्या भाजीमंडईत गावरान आंबे फारसे पहावयास मिळाले नाहीत. मात्र बाहेर राज्यातून बीड शहरामध्ये लंगडा, हापूस, दशहरी यासह इतर जातीचे आंबे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. या आंब्याच्या किमती १०० ते २५० रुपयांच्या घरात होत्या. आंब्याची मागणी चांगली होती, अशी प्रतिक्रिया आंबा विक्रेते शेख आमेर यांनी सांगितले. पुढील काळात आंब्याच्या किमती काही प्रमाणात वाढतील. मात्र अक्षयतृतीयेच्या निमित्ताने अनेकांनी पुरणपोळीसह आमरसाचा आनंद लुटला.