दुष्काळात धुतले हात!

By Admin | Updated: July 12, 2016 01:08 IST2016-07-12T00:35:07+5:302016-07-12T01:08:52+5:30

संजय देशपांडे -औरंगाबाद दुष्काळी अनुदानापासून जिल्ह्यातील अनेक गरजू शेतकरी अद्याप वंचित असताना गंगापूर तालुक्यातील काही महाभागांनी ३ ते १५ वेळा अनुदानाच्या रकमेवर डल्ला मारला आहे.

Dry hand washed in a famine! | दुष्काळात धुतले हात!

दुष्काळात धुतले हात!

संजय देशपांडे -औरंगाबाद
दुष्काळी अनुदानापासून जिल्ह्यातील अनेक गरजू शेतकरी अद्याप वंचित असताना गंगापूर तालुक्यातील काही महाभागांनी ३ ते १५ वेळा अनुदानाच्या रकमेवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे शेतकरी नसणाऱ्यांच्याही खात्यात अनुदानाची खिरापत टाकण्याचा पराक्रम महसूल खात्यातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला आहे. ‘महसूल’ची चूक लक्षात आल्यानंतर जिल्हा बँकेच्या काही अधिकारी- कर्मचाऱ्यांनीही आपल्या नातेवाईक, मित्रांच्या खात्यावर अनुदानाच्या रकमा जमा करून घेतल्याचे आढळून आले आहे.
२०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षात दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी ६,८०० रुपये किंवा जास्तीत जास्त १३,६०० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले. तलाठ्यांनी दिलेल्या यादीनुसार अनुदानाच्या रकमा संबंधित शेतकऱ्यांच्या जिल्हा सहकारी बँकेतील खात्यात जमा करण्यात आल्या.
लाभार्थ्यांच्या बनावट याद्या
गंगापूर तालुक्यातील सिरेसायगाव आणि गवळी शिवरा या सजाच्या तलाठ्यांनी काही जणांना शेतकरी नसतानाही शेतकरी असल्याचे दाखविण्याची करामत केली.
या व्यक्तींनी जिल्हा बँकेत रातोरात अनेक खाती उघडली. अनुदानाच्या यादीत अशा प्रकारे बनावट लाभार्थ्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला. एका बँकेत एका व्यक्तीचे एकच बँक खाते असणे गरजेचे असताना जिल्हा बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनेक खाती उघडण्यास मदत केली. त्या बदल्यात आपल्याही नातेवाईक, मित्र, आप्तेष्टांच्या खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले.
महसूल आणि जिल्हा बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे संगनमत करून बनावट लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले. अनुदानाची ही रक्कम सव्वाकोटी रुपयांच्या घरात आहे.
जिल्हा बँकेची घोटाळेबाजांवर कारवाई
आपल्याच काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नातेवाईक, मित्रांच्या नावावर खाती उघडून अनुदान लाटल्याचे, तसेच इतरांना बनावट खाती उघडून देण्यास मदत केल्याचे लक्षात येताच जिल्हा सहकारी बँकेने कठोर भूमिका घेतली.
४याप्रकरणी तालुका लेखाधिकारी जाधव, शाखाधिकारी खेडकर आणि बारहाते, लिपिक मोकळे आणि निकम, निरीक्षक कबाडी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
४या सहा जणांची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रामेश्वर कल्याणकर यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर
जिल्हा बँकेच्या सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या, कुटुंबियांच्या तसेच नातेवाईकांच्या नावावर दुष्काळी अनुदानाची रक्कम जमा करून घेतल्याचे आढळल्यानंतर आम्ही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बनावट शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून लाभार्थ्यांच्या यादीत त्यांचा समावेश केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून वेळीच निदर्शनास आणून देण्यात आले. चुकीच्या व्यक्तींची कधीच पाठराखण करीत नसल्याचे बँकेने यानिमित्त दाखवून दिले.
- रामेश्वर कल्याणकर, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा सहकारी बँक
‘यांनी’ साधली दुष्काळी पर्वणी
राज्य सरकारकडून मिळालेले अनुदान ही पर्वणीच समजून अनेकांनी त्यात हात धुऊन घेतले. ८६ बोगस लाभार्थ्यांना १ ते १५ वेळा ७,६५० ते १ लाख ४३ हजार रुपयांपर्यंतच्या अनुदानाचा लाभ देण्यात आला.
४सुभाष भोसले (रा. गोळेगाव) यांनी रघुनाथनगर, गाजगाव, लासूर स्टेशन येथील जिल्हा बँकेच्या शाखेत स्वत:सह पत्नी, आई, वडील, मुलगा यांच्या नावाने ८ बँक खाती उघडून १० लाख २३,९६५ रुपयांचे अनुदान पदरात पाडून घेतले. भोसले यांनी तब्बल १५ वेळा अनुदान उचलले आहे.
४प्रवरानगर (ता. राहाता) येथील रहिवासी असलेल्या अमोल शिरसाठ यांना शिरेसायगाव, गवळी शिवराचे शेतकरी दाखवून तब्बल २१ वेळा २ लाख १८,४३० रुपयांच्या अनुदानाचा लाभ देण्यात आला. परजिल्ह्यातील व्यक्तीस शेतकरी असल्याचे दाखविण्याची करामत या प्रकरणात करण्यात आली.
४पार्वताबाई कोसे (रा. गोळेगाव) या दहा वर्षांपूर्वी निधन झालेल्या महिलेच्या नावावर ८ वेळा अनुदान जमा करून ७२, ३३० रुपये लाटण्यात आले.
४परवीन पठाण (रा.गोळेगाव) यांना १० वेळा लाभ देताना ८८,२०० रुपयांचे अनुदान देण्यात आले.
४गुलाब हारुण, हारुण इस्माईल (रा. गोळेगाव) यांच्या खात्यात १२ वेळा १ लाख ४,१३० रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले.
४अकील अजीज, समया पठाण यांच्या खात्यात ८ वेळा ६८,४०० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
४अहेमद सय्यद यांना ९ वेळा अनुदान देताना ७०,५०० रुपयांची रक्कम खात्यात जमा करण्यात आली. बाबू चाँद शेख यांना ७ वेळा अनुदान देताना ६७,२०० रुपये देण्यात आले. नवाब चाँद शेख यांना ८ वेळा अनुदान देताना ७२,५५५ रुपयांचा लाभ देण्यात आला.
४मालनबाई शिंदे (रा. जामगाव) यांना ५ वेळा अनुदान देताना ७०,९१६ रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.

Web Title: Dry hand washed in a famine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.