घातक रसायनांची उघड्यावर विल्हेवाट
By Admin | Updated: April 15, 2016 01:47 IST2016-04-15T01:24:27+5:302016-04-15T01:47:54+5:30
वाळूज महानगर : ‘एमआयडीसी’च्या मोकळ्या भूखंडांवर घातक रसायनांची विल्हेवाट लावली जात असल्यामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीत प्रदूषणाचा धोका वाढला आहे

घातक रसायनांची उघड्यावर विल्हेवाट
वाळूज महानगर : ‘एमआयडीसी’च्या मोकळ्या भूखंडांवर घातक रसायनांची विल्हेवाट लावली जात असल्यामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीत प्रदूषणाचा धोका वाढला आहे. या रसायनांचा उग्र वास व दुर्गंधीमुळे नागरिक व जनावरांच्या जीवितास तसेच पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे.
वाळूज औद्योगिक परिसरातील काही कारखाने घातक रसायनांनी भरलेल्या गोण्या व पावडर ‘एमआयडीसी’च्या भूखंडांवर आणून टाकत आहेत. रात्रीच्या वेळी सर्वत्र सामसूम असताना वाहनातून ही घातक रसायने मोकळ्या भूखंडांवर आणून टाकली जातात.
स्क्रॅपबरोबर ही रसायने पेटवून दिली जातात. धोकादायक रसायने जाळल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीचालक व नागरिकांना डोळ्यात जळजळ होणे, उलट्या होणे, डोकेदुखी आदींचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.
मायलान कंपनीच्या जवळील मोकळ्या भूखंडावर घातक रसायनाची विल्हेवाट लावण्यात येते. भूखंडावर अॅसिडच्या प्लास्टिकच्या गोण्या आणून टाकल्या जातात. या अॅसिडचा उपयोग साबण, डिटर्जंट पावडर, सेव्हिंग क्रिम व मद्यनिर्मितीसाठी केला जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गस्तीसाठी रात्री कुणीही इकडे फिरकत नसल्यामुळे काही कारखान्यांनी हा सोपा उपाय अमलात आणला आहे. वाहतूकदार व काही राजकीय व्यक्तींशी संगनमत करून अशा प्रकारे उघड्यावर घातक रसायनांची विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढत आहे.
यंत्रणांचे दुर्लक्ष
मोकळ्या भूखंडावर घातक रसायनांची विल्हेवाट लावली जात असल्याच्या प्रकाराकडे ‘एमआयडीसी’ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या दोन्ही विभागात समन्वय नसल्यामुळेच प्रदूषण करणाऱ्यांचे फावत असल्याचे आरोप होत आहेत. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप घातक रसायनांची पाहणी केली नसल्याच्या तक्रारी आहेत.
याबाबत ‘एमआयडीसी’च्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.