धारूर सा.बां. विभागाचा कारभार राम भरोसे

By Admin | Updated: June 9, 2014 00:05 IST2014-06-08T23:21:27+5:302014-06-09T00:05:53+5:30

धारुर: धारुर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कारभार राम भरोसे चालत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे.

Dharur Sa.b. Ram Bharosse | धारूर सा.बां. विभागाचा कारभार राम भरोसे

धारूर सा.बां. विभागाचा कारभार राम भरोसे

धारुर: धारुर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कारभार राम भरोसे चालत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. येथे कार्यरत असलेले उपअभियंता व कनिष्ठ अभियंता हे उंटावरुनच कारभार हाकत असल्याने महिनाभरापूर्वी करण्यात आलेले रस्ते उखडू लागले आहेत. केवळ महिनाभरातच हे रस्ते उखडल्याने या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
धारुर सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता एस.डी. नाईक, कनिष्ठ अभियंते दोन आहेत, मात्र हे सर्व लातूरहूनच धारुर सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार हाकतात. उपअभियंता व कनिष्ठ अभियंता हे तब्बल महिना-महिना सा.बां. विभागाच्या कार्यालयाकडे फिरकत नसल्याने होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असून, उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना वरिष्ठांचेच अभय असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत यांनी केला आहे. पांगरी ते वाघोली हे ४ कि.मी.अंतर असलेल्या रस्त्याचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे झाले असून, या रस्त्यावर हॉटमिक्स कारपेट करण्याचे टाळून सरफेज ड्रेसिंग करुन काम आटोपते घेण्यात आले. त्यामुळे महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्यावर खड्डे झाले आहेत. तीच अवस्था धारुर, आसरडोह रस्त्याची झाली असून, या रस्त्याचे काम होऊन यावर आत्ताच खड्डे झाल्याने पावसाळ्यात याची काय अवस्था होणार? असा प्रश्न भाजपाचे बाळासाहेब कुरुंद यांनी उपस्थित केला आहे. या सर्व कामाच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. या सर्व कारभाराकडे उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्याचे दुर्लक्ष असल्याचा आरोपही कुरुंद यांनी केला आहे. या कार्यालयाचा कारभार पूर्णपणे ढासळत चालला असून, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे यांच्यावर अंकुश कोण ठेवणार? कामाचा दर्जा सुधारणार की नाही? यासारखे अनेक प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केले जात आहेत.
याबाबत उपविभागाचे उपअभियंता एस.डी. नाईक, कनिष्ठ अभियंता देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हे दोन्ही अभियंते मागील अनेक दिवसांपासून कार्यालयाकडे फिरकले नसल्याने सर्वसामान्यांमधून तर्कवितर्क लावले जात आहेत. हे अभियंते लातूरला वास्तव्यास असल्याने धारुरच्या सा.बां. विभागाचा संपूर्ण कारभार हा लातूरहूनच हाकला जात असल्याचा आरोपही कुरुंद व सावंत यांनी केला आहे.
सा.बां. विभागाच्या गलथान कारभारामुळे धारुर तालुक्यातील अनेक रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. महिनाभरातच रस्ते उखडत असल्याने रस्त्यासाठी आलेला निधी हडप करण्याचे काम अभियंत्यासह इतर अधिकारी, कर्मचारी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या दोन्ही अभियंत्यांनी धारुर कार्यालयात थांबून व्यवस्थित काम करुन सर्वसामान्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
(वार्ताहर)
नियंत्रणाचा अभाव
अभियंते कार्यालयात हजर राहत नसल्याने रस्त्याचे कामे होत आहेत निकृष्ट दर्जाचे
महिनाभरातच उखडले रस्ते
अभियंत्यांच्या कामकाजावर सर्वसामान्यांमधून होतोय प्रश्न उपस्थित
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याचा बंडोबा सावंत, बाळासाहेब कुरुंद यांचा आरोप

Web Title: Dharur Sa.b. Ram Bharosse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.