औरंगाबाद : राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे, अशी घोषणा केली. मराठवाड्यात २५ हजार तर औरंगाबाद जिल्ह्यात २४१७ शेततळ्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १० हजार अर्ज आलेले असताना २४१७ लाभधारक होत असतील, तर मागेल त्याला शेततळे ही घोषणाच कुठे तरी विसंगत असल्याचे मत पालकमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत व्यक्त केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची बैठकीला उपस्थिती होती. टप्प्याटप्प्याने सर्वांना शेततळी देण्यात येतील, अशी सारवासारव करून बागडे यांनी बैठक दुसऱ्या विषयाकडे नेली. तर पालकमंत्री कदम पत्रकारांशी बोलताना म्हणाले, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तसेच येत्या कॅबिनेटमध्येदेखील योजनेप्रकरणी उद्दिष्ट ठेवण्याऐवजी प्रत्येक अर्जाचा विचार करावा, असा मुद्दा मांडण्यात येईल. बैठकीत कृषी अधिकारी रमाकांत पडवळ यांनी जिल्ह्यातील शेततळ्यांचे अर्ज आणि उद्दिष्टांची माहिती दिली. त्यावर पालकमंत्री म्हणाले, जर मुख्यमंत्र्यांनी मागेल त्याला शेततळे अशी घोषणा केली आहे, तर मग उद्दिष्ट आले कुठून, असा सवाल कदम यांनी केला. कृषी अधिकारी पडवळ उत्तर देताना म्हणाले, दारिद्र्यरेषेखालील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब, आॅनलाईन अर्जानुसार प्राधान्याने लाभार्थी निवडण्यात येतील. जास्त अर्ज आल्यामुळे उद्दिष्ट ठरवावे लागले. यावेळी बागडे म्हणाले, आॅनलाईन अर्जांमध्ये जुने लाभार्थी आहेत काय, नसतील तर टप्प्याटप्प्यांनी लाभार्थी निवडावेत.
मागेल त्याला शेततळे घोषणा विसंगत
By admin | Updated: April 17, 2016 01:31 IST